-   मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी ईव्हीएममध्ये होणाऱ्या गैरप्रकारांवर भाष्य केले आहे. 
-  या प्रकरणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “मी गेली अनेक वर्षे हे ओरडून सांगतोय. मागे आपले शिबिर झाले तेव्हाही मी सांगितले होते की, लोक म्हणतात की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, पण त्याचे मतांमध्ये परिवर्तन होत नाही. लोक आपल्याला मतदान करत आहेत. पण हे जे गेल्या दहा-बारा वर्षांपासून सुरू झाले आहे, या भानगडींमुळे आपल्याला पराभव पत्करावा लागतो.” 
-  ते पुढे म्हणाले की, “या सगळ्या प्रक्रियेतून सत्तेमध्ये यायचे आणि हवी तशी सत्ता राबवायची. पाच वर्षं झाली महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. यासाठी आणखी एक वर्ष लागले तरी चालेल, पण मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत. एक वर्ष निवडणुका लांबल्याने काही फरक पडणार नाही.” 
-  यावेळी निवडणुकांतील गैरप्रकारांची मॅच फिक्सिंगशी तुलना करताना राज ठाकरे म्हणाले की, “आपल्या क्रिकेटमध्ये ज्यावेळी मॅच फिक्सिंग झाले होते, त्यावेळी अझरुद्दीन ते जडेजापर्यंत सर्वांना काढून टाकले. पण इथे कोणालाच काढत नाहीत.” 
-  कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात या मोर्चात सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन करताना राज ठाकरे यांनी, “सुट्टीची कारणे देऊ नका, बॉसला एक मारा पण मोर्चाला या”, असे अजब आवाहन केले. 
-  निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मतदारांना आवाहन करताना राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्रातील सर्व मतदारांनी या मोर्चात सहभागी व्हावे. महाराष्ट्रात काय प्रकारचा राग आहे, तो या मोर्चातून दाखवा.” 
-  ते पुढे म्हणाले, “राग व्यक्त करण्यासाठी तुम्हाला मोर्चात यावे लागेल. नोकरीची कारणे देऊ नका. बॉस सुट्टीसाठी नाही म्हणाला तर त्याला एक मारा. शनिवारपुरते एक मत त्याच्या गालावरही द्या. मला वाटते तुमचा बॉसही मतदारच असेल, त्यालाही मोर्चाला घेऊन या.” 
-  राज ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्र सरकार शिवनेरी, रायगड, राजगडावर नमो केंद्र स्थापन करणार आहे. जिथे फक्त आमच्या महाराजांचे नाव असले पाहिजे. तिथे हे आता पर्यटन केंद्र उभारणार आहेत. मी आताच सांगतो. आमच्याकडे सत्ता असो वा नसो. वर नाही किंवा खाली, आजूबाजूला कुठेही सत्ता नसो. पण हे पर्यटन केंद्र उभे केले की, फोडून काढणार. 
“सभांना गर्दी, तरीही पराभव” ते “बॉसला एक मारा”, मनसे मेळाव्यात राज ठाकरे काय बोलले?
Raj Thackeray: कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात या मोर्चात सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन करताना राज ठाकरे यांनी, “सुट्टीची कारणे देऊ नका, बॉसला एक मारा पण मोर्चाला या”, असे अजब आवाहन केले.
Web Title: Raj thackeray evm malfunction speech mns morcha election commission protest maha vikas aghadi morcha mumbai voter list maharashtra aam