-
टी-२० विश्वचषक २०२१ चा ४२वा सामना आज सोमवारी भारत विरुद्ध नामिबिया असा रंगणार आहे. या सामन्यासोबत टीम इंडियाचा स्पर्धेतील प्रवासही संपुष्टात येईल. विराट कोहलीच्या टीम इंडियासाठी हा टी-२० विश्वचषक दुःखद स्वप्नासारखा होता.
-
अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडला पराभूत करून कोहलीच्या संघाने आशा जिवंत ठेवल्या होत्या, मात्र न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान सामन्यावर पूर्ण गणित निश्चित होणार होते. न्यूझीलंडने अफगाणिस्तानला पराभूत करत भारताला स्पर्धेतून बाहेर ढकलले. भारताचा नामिबियाविरुद्धचा सामना आता केवळ औपचारिकता आहे. या स्पर्धेत अशा तीन गोष्टी घडल्या, ज्या भारतीय संघासाठी नवीन होत्या.
-
१. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला. २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला.
-
२. टी-२० विश्वचषक २०२१ मधील उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर आता नामिबियासोबत भारताचा सामना ही केवळ औपचारिकता आहे. आयसीसीच्या स्पर्धेत भारताला असा औपचारिक सामना खेळावा लागल्याचे क्वचितच पाहायला मिळते. याआधी, १९९२ च्या विश्वचषकात त्यांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले होते, त्यावेळी उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळला होता.
-
३. २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघ प्रथमच कोणत्याही स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकलेला नाही. भारत २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला. त्यानंतर २०१४ च्या टी-२० विश्वचषकात तो उपविजेता ठरला होता. २०१५ च्या एकदिवसीय विश्वचषकात संघाने उपांत्य फेरी गाठली होती. २०१६ टी-२० विश्वचषकातही असेच घडले होते. २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. २०१९ मध्ये एकदिवसीय विश्वचषकातील भारताची मोहीम उपांत्य फेरीत संपली. या वर्षीच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्येही भारत उपविजेता ठरला.
T20 WC: निराशादायकच, तरीही…; टीम इंडियासोबत पहिल्यांदाच घडल्यात या ३ गोष्टी!
विराटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाचा प्रवास लवकर संपुष्टात आला आहे.
Web Title: These three things happened for the first time with team india in t20 world cup