Nitish Kumar Bihar Election : महाराष्ट्र, हरियाणा व त्यापाठोपाठ दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकून भाजपाने आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवला. राजधानीत तब्बल २७ वर्षानंतर सत्तास्थापन केल्यानंतर भाजपाने आपले लक्ष्य बिहारच्या निवडणुकीवर केंद्रित केलं आहे. यावर्षीच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, जागावाटपाचा मुद्दा व मुख्यमंत्रिपदावरून एनडीएमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामागचं कारण म्हणजे, भाजपाचा प्रमुख मित्रपक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टीचे (राम विलास) प्रमुख चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात असलेले केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे आगामी निवडणुकीत अनेक जागांवर दावा करण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत आणि त्यापैकी ३८ जागांवर एनडीएचे घटक पक्ष एकमेकांविरोधात दावा करू शकतात, असं सांगितलं जात आहे. राज्यात सध्या भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असून मुख्यमंत्रिपद जेडीयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांच्याकडे आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांच्या पक्षाने जेडीयूचं अनेक जागांवर नुकसान केलं होतं.
‘जेडीयू’च्या जागांवर ‘लोजपा’चा डोळा?
पक्षातील अंतर्गत सूत्रांनुसार, ज्या जागांवर लोजपाच्या उमेदवारांनी जेडीयूच्या उमेदवारांपेक्षा जास्त मते घेतली होती, त्याच जागांवर चिराग पासवान हे दावा करण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी एकसंध असलेल्या लोक जनशक्ती पार्टीने ३८ पैकी ३२ जागांवर जेडीयूच्या उमेदवारांपेक्षा जास्त मते घेतली होती. या ३२ पैकी किमान २६ जागांवर ‘लोजपा’ने जेडीयूच्या पराभवाच्या फरकापेक्षा अधिक मते मिळवली होती. विशेष म्हणजे, यातील पाच जागांवर ‘लोजपा’चे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. तर एक जागा त्यांनी ३३३ मतांच्या फरकाने जिंकली होती.
आणखी वाचा : ‘आप’-काँग्रेसच्या भांडणात भाजपाचा होणार फायदा? केजरीवालांचं ‘ते’ स्वप्न भंगणार?
‘लोजपा’ने लढवली होती स्वबळावर निवडणूक
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी मतभेद असल्याचं सांगून लोक जनशक्ती पक्षाने गेल्यावेळची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. चिराग पासवान यांच्या पक्षाने काही प्रमुख जागांवर एनडीएमधील इतर घटक पक्षांपेक्षा चांगली कामगिरीही केली होती. २०२० मध्ये भाजपा, जेडीयू व इतर त्यांच्या इतर मित्रपक्षांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपाने २४३ पैकी ११० जागा लढवल्या आणि त्यापैकी ७४ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. तर जेडीयूने ११५ जागा लढवूनही त्यांना केवळ ४३ जागाच जिंकता आल्या. तर हिंदूस्थान अवाम मोर्चासह इतर मित्रपक्षांनी २० जागा लढवल्या आणि त्यापैकी ८ जागांवर विजय मिळवला.
नितीश कुमारांना केलं होतं लक्ष्य
विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्यानंतर चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांना लक्ष्य केलं होतं. त्यांनी आपल्या पक्षाचे बहुताश उमेदवार जेडीयूविरोधात उभे केले होते. या लढतीत लोक जनशक्ती पार्टीने केवळ एका जागावर विजय मिळविला असला तरी त्यांनी जेडीयूला मोठं नुकसान पोहोचवलं होतं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी चिराग पासवान यांचा पक्ष पुन्हा एनडीएमध्ये सामील झाला. ही भागीदारी लोक जनशक्ती पक्षासाठी अत्यंत फायदेशीर ठरली. त्यांनी लढवलेल्या लोकसभेच्या सर्वच पाच जागा जिंकल्या आणि चिराग पासवान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळाले.
बिहार निवडणूक चिराग पासवान यांचे लक्ष्य
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पार्टीची गाडी रुळावर आणल्यानंतर चिराग पासवान आता विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात आक्रमक भूमिका घेणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. ‘लोजपा’च्या एका नेत्याने सांगितलं की, मागील निवडणुकीत जिथे पक्षाने चांगली कामगिरी केली आहे, अशा जागांवर आम्ही ठाम दावा करणार आहोत. लोक जनशक्ती पार्टीचे एक प्रमुख नेते म्हणाले, “२०२० मध्ये पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती, तर जेडीयू व इतर पक्ष भाजपाबरोबर आघाडीत होते. तरीही त्या जागांवर जेडीयूचा दारुण पराभव झाला. यंदाच्या निवडणुकीत या जागा आमच्या पक्षाला मिळाल्या तर विरोधकांचा आम्ही सहज पराभव करू.”
हेही वाचा : भाजपाचं ‘या’ राज्यातील सरकार गोत्यात? मुख्यमंत्र्यांविरोधात मोठं आंदोलन होणार?
एनडीएमध्ये जागावाटपावरून खटके उडणार?
दरम्यान, नितीश कुमार यांचा जेडीयू पक्षही लोक जनशक्ती पार्टीपासून सावध भूमिका देताना दिसून येत आहे. जेडीयूच्या एका नेत्याने सांगितले, “ ‘लोजपा’ आता एनडीएचा भाग असल्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा मुद्दा कळीचा ठरू शकतो.” जेडीयूच्या प्रवक्त्या अंजुम आरा म्हणाल्या, “प्रत्येक राजकीय पक्षाला जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवायची इच्छा असते. पण एनडीए ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. आमच्यात कोणताही वाद होणार नाही आणि जागावाटपाचा मुद्दा सहयोगी पक्षांबरोबरच चर्चा करूनच सोडवला जाईल.”
मंत्री चिराग पासवान काय म्हणाले?
दरम्यान, बिहार निवडणूक लढविण्याबाबत माध्यमांनी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, “मी आधीच सांगितले आहे की, मला केंद्रीय राजकारणात फारसा रस नाही. केवळ बिहार व बिहारच्या लोकांसाठी मी राजकारणात आलो आहे. ‘बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट’ हे माझं स्वत:चं व्हिजन आहे. खासदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर मला जाणवलं की, दिल्लीत राहून हे शक्य होणार नाही.” बिहार निवडणुकीत एनडीएच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबद्दल विचारले पासवान यांना विचारले असता ते म्हणाले की, बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर अद्याप कोणत्याही पक्षाने दावा केलेला नाही. निवडणूक निकालानंतर नितीश कुमार हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील.