कोल्हापूर : ‘शासन आपल्या दारी’ या राज्यशासनाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी कोल्हापुरात येत असताना विकासकामे, टक्केवारी वरून शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटातील वाद उफाळला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. तर, विरोधी आमदारांनी जिल्हा नियोजन निधीतील निधीतील असमानतेबरोबर नाराजीला तोंड फोडले आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या हिंसाचाराचे पडसादही या वेळी उमटण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असताना राजकीय वाद झडत आहे. ठाकरे शिवसेनेने कोल्हापुरातील ऐतिहासिक राजाराम तलाव आणि कोल्हापुरातील रस्ते प्रकल्पावरून आंदोलन तापवत ठेवले आहे. या तलाव परिसरात कन्व्हेन्शन सेंटर उभे करण्यासाठी शासनाने १ लाख ३७ हजार चौरस फुट क्षेत्रात बांधकाम होणाऱ्या या कामासाठी १०० कोटी रुपये खर्चास गेल्या महिन्यात मंजुरी दिली आहे.

हेही वाचा – सांगली भाजपमध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ?

छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलेल्या ऐतिहासिक राजाराम तलावातील समृद्ध पर्यावरणावर आघात करणारा हा प्रकल्प आहे. तलाव आणि परिसरात स्थलांतरित पक्षी, मासे, फुलपाखरे याची विविधता संपुष्टात येणार असल्याने हे केंद्र नजीकच्या शिवाजी विद्यापीठ परिसरात उभारण्यात यावे, अशी मागणी करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह राजाराम जलतरण मंडळाचे अध्यक्ष उदय येवलुजे आदींनी राजाराम तलावाच्या पाण्यात उतरून आंदोलन केले. त्यावरून शिवसेनेच्या दोन गटांतील वादाला तोंड फुटले. ‘विरोधाला विरोध ही भूमिका चुकीची आहे. काम होऊ द्यायचं नाही आणि करूनही देणार नाही ही भूमिका खपवून घेतली जाणार नाही,’ असा इशारा शिंदे गटाचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ठाकरे गटाला दिला आहे.

रस्ते कामावरून संघर्ष

कोल्हापुरातील रस्त्यांची दुरवस्था दूर होण्यासाठी राज्य शासनाने १०० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये अर्थपूर्ण व्यवहार केले जात असल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. ‘हे काम एकाच ठेकेदाराकडून करून घेण्याचा शासनाचा आदेश टाळून दोन माजी आमदार, चार ठेकेदार, महापालिकेचे शहर अभियंता यांच्या उपस्थितीत टक्केवारीसाठी व्यवहार झाला,’ असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख, माजी नगरसेवक यांनी महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांची भेट घेवून केला. ‘(मविआच्या) स्थानिक आमदारांच्या पत्राचा विचार न करता माजी आमदारांनी दिलेल्या पत्रानंतर शासनाकडे मार्गदर्शन कसे मागितले जाते. त्यांचा या कामांमध्ये संबंध येतोच कसा?’, असे प्रश्न उपस्थित करीत प्रशासनाला धारेवर धरताना शिवसैनिकांनी राजेश क्षीरसागर यांच्यावरील जुना रागाला नव्याने झालर चढवली आहे. कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात निधी आला असताना त्याला खोडा घालण्याचे काम ठाकरे गटाच्या टोळक्याकडून केला जात आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्याकडे करीत शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या गतवर्षीच्या दौऱ्यावेळी शिवसैनिकांनी आक्रमक आंदोलन केले होते. याही वेळी ते वरील प्रश्नावरून पुन्हा रस्त्यावर येताना दिसत आहेत.

हेही वाचा – हरियाणामध्ये भाजपा-जेजेपी यांच्यातील युती तुटणार? मनोहरलाल खट्टर यांच्या विधानामुळे संभ्रम वाढला!

राजू शेट्टी आक्रमक

दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आक्रमक पवित्रा घेतला आहे. उसाची एफआरपी, ऊस दर नियंत्रण समिती, पीक विम्याचे पैसे, प्रोत्साहनपर अनुदान या शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये कमालीची दिरंगाई होत असल्याचे मुद्दे पुन्हा उपस्थित केले आहे. ‘निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान म्हणवले जात असताना गेल्या नऊ महिन्यांपासून ऊस दर नियंत्रण समिती स्थापन न करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या जनता दरबारात हजारोंच्या संख्येने या,’ अशी आवाहनपर साद राजू शेट्टी यांनी घातली आहे. शेट्टी यांचे राजकीय स्पर्धक शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने हे असल्याने या आंदोलनाला तसा राजकीय संदर्भही आहेच.

दंगलीच्या राजकारणाची किनार

कोल्हापुरातील दंगलीचे वातावरण आता थंडावले असले तरी राजकीय टीकाटिपणी सुरू आहे. जिल्ह्यातील उभय काँग्रेस, पुरोगामी पक्षांनी यावर बोलण्याचे टाळले आहे. तरी राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवार हे मात्र (एकटेच) तातडीने दाखल झाले. ‘दंगल घडली की घडवली ?’ असा प्रश्न त्यांनी राज्यकर्त्यांना केला आहे. राज्यातील ‘मविआ’च्या वरिष्ठ नेत्यांनी असाच टीकात्मक सूर लावला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy surrounds to cm eknath shinde visit to kolhapur print politics news ssb