ठाणे : देशात एक काळ असा होता की जेव्हा ‘ओन्ली विमल’ ही जाहीरात सर्वत्र गाजत होती. आता देशात ‘ओन्ली कमळ’ हा एकमेव नारा सर्वत्र घूमत आहे. ठाणे शहरात भविष्यकाळात सुशासन हवे असेल, तुम्हाला २४ तास पाणी हवे असेल तर ठाण्यातही ‘ओन्ली कमळ’ हा नारा घुमायला हवा. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाने जर मला ठाण्याची जबाबदारी दिली तर ठाण्यात माझे ऐका. तुमच्या जगणे सुरळीत करण्याचा मी तुम्हाला शब्द देतो, अशा शब्दात वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी सायंकाळी ठाणे महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचा एक भाग असलेल्या कोपरी परिसरात भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नाईक उपस्थित होते. यावेळी कोपरी मंडळ भाजपच्या वतीने नाईक यांचा जाहीर सत्कारही करण्यात आला. यावेळी बोलताना नाईक यांनी ‘ठाणेकरांचे जगणे सुसह्य करायचे असेल तर आता ‘ओन्ली कमळ’ हाच ध्यास ठेवायला हवा’ असे आवाहन त्यांनी केले.

ही केवळ माझी भावना नाही, तर ठाण्याचे आमदार संजय केळकर, विधान परिषदेचे आमदार निरंजन डा‌वखरे यांचीही ही भावना आहे. जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनाही तसेच वाटत असेल. त्यामुळे ठाण्यात जर सुशासन हवे असेल तर ओन्ली कमळ ही भावना लोकांमध्ये रुजू द्या, असे आवाहन नाईक यांनी यावेळी केले. ठाणेकरांच्या हितासाठी झोकून काम करताना इतर कोणाचाही उल्लेख, टिका करायची गरज नाही, अशी टोलेबाजीही नाईक यांनी यावेळी केली.

भरपूर पाणी, चांगले रहाणीमान यासाठी भाजपला साथ द्या

गेली २५ वर्ष मी नवी मुंबईतील सत्ता एकहाती राखली. या शहराचे पहिला महापौर संजीव नाईक होते आणि आतापर्यतचे अखेरचे महापौर ठरलेले जयवंत सुतार हेदेखील आपल्या विचारांचे होते. नवी मुंबईत गणेश नाईक या नावाने निवडणुका लढलो आणि जिंकलोही. मी शिवसेनेत होतो, तेव्हा त्या शहरात ओन्ली शिवसेना, राष्ट्रवादीत गेलो तेव्हा महापालिकेत ओन्ली राष्ट्रवादी आणि येत्या काळात भाजप आणि भाजपच रहाणार असा दावा गणेश नाईक यांनी यावेळी केला. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत गणेश नाईक तुमच्या सर्वांचे नेतृत्व करत सर्वात पुढे राहील असा शब्द देतो, असे ते यावेळी म्हणाले. नवी मुंबईत मागील २० वर्ष मी घरपट्टी, पाणीपट्टी वाढू दिली नाही. ठाण्यात जर चांगली व्यवस्था हवी असेल तर मी जे सांगतो ते ऐकायला हवे. मी जे बोलतो ते करुन दाखवितो. नवी मुंबईला सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळतो. ठाणेकरांना मात्र पाण्यासाठी रात्री अपरात्री उठावे लागते. नवी मुंबईत २४ तास पाणी पुरवठा होतो. नवी मुंबईत शिक्षण मोफत आहे, उत्तम दळणवळणाची व्यवस्था आहे. ठाण्यातील चित्र बदलावे आणि सुशासन यावे असे तुम्हाला वाटत नाही का, असा सवाल नाईक यांनी यावेळी केला.

जनता दरबार घेणार

ठाणे महापालिकेची निवडणुक चार प्रभागांची होईल. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी यासंबंधीचे नियोजन करुन घ्या. याठिकाणचे अभियंते, शहरविकास विभागाचे अधिकारी यांच्या संपर्कात रहा. मी पालघरचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथेही माझा जनता दरबार भरेल, अशी घोषणा नाईक यांनी यावेळी केली. पक्षाने माझ्यावर ठाण्याची जबाबदारी दिली तर माझे ऐका, तुमचे आयुष्य सुरळीत व्हावे यासाठी मी जीवाचे रान करेन, असे नाईक म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest minister ganesh naik prepare for thane municipal corporation elections create unrest in shiv sena print politics news zws