आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत पक्षाकडून तिकीट मिळावे यासाठी अनेक नेते आपापल्या पातळीवर प्रयत्न करीत आहेत. ज्या नेत्यांना तिकीट मिळणार नाही, असे वाटतेय, ते नेते अन्य मार्ग चोखाळत आहेत. केंद्रीय मंत्री राहिलेले हरियाणातील भाजपाचे नेते चौधरी बिरेंद्रसिंह हेदेखील अशाच नव्या मार्गाचा शोध घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी २ ऑक्टोबर रोजी एका सभेचे आयोजन केले आहे. या सभेमध्ये भाजपाचा झेंडा किंवा बॅनर नसेल. याच कारणामुळे सिंह यांच्या या सभेची हरियाणात चर्चा होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाचा झेंडा घेऊन न येण्याचे आवाहन

चौधरी बिरेंद्रसिंह हे भाजपाचे नेते आहेत. त्यांनी याआधी केंद्रात मंत्रिपदही भूषवलेले आहे. त्यांनी २ ऑक्टोबर रोजी एका विशेष सभेचे आयोजन केले आहे. या सभेत येणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपाचा झेंडा घेऊन येऊ नये, असे सांगण्यात आले आहे. सभास्थळीदेखील भाजपाचा उल्लेख असलेला कोणताही बॅनर नसेल. या सभेदरम्यान फक्त भारताचा राष्ट्रध्वज घेऊन यावे, असे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आहे. ‘मेरी आवाज सुनो’ असे नाव या सभेला देण्यात आले असून, ‘बिरेंद्रसिंह के साथी’ या ग्रुपने या सभेचे आयोजन केले आहे.

चंद्रशेखर आझाद यांनाही आमंत्रण

बिरेंद्रसिंह यांच्या जवळच्या नेत्याने या सभेबाबत ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला अधिक माहिती दिली आहे. नवे सामाजिक समीकरण निर्माण व्हावे यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या माध्यमातून सिंह यांचे प्रतिमासंवर्धन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे या नेत्याने सांगितले. तसेच या सभेला ‘भीम आर्मी’चे प्रमुख चंद्रशेखर आझाद, तसेच भारतीय किसान युनियनचे प्रमुख युधवीरसिंह यांनादेखील आमंत्रित करण्यात आले आहे. २०२० सालच्या शेतकऱ्यांच्या कृषी आंदोलनादरम्यान युधवीरसिंह हे कृषी कायद्यांना विरोध करणारे भाजपाचे एकमेव नेते होते.

शेतकरी आणि गरिबांना काही फायदा झाला का?

या सभेबाबत बिरेंद्रसिंह यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “१९९१ साली आर्थिक सुधारणा लागू केल्यानंतर भारताने मोठी प्रगती केली. केंद्र सरकार म्हणते की, भारत जगातील सर्वांत मोठी पाचवी अर्थव्यवस्था आहे. लवकरच भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी पाचवी अर्थव्यवस्था होईल असेही सरकार सांगत आहे. मात्र, ३२ वर्षांतील आर्थिक सुधारणांचा शेतकरी आणि गरिबांना काही फायदा झाला का? देशात फक्त व्यापारीवर्ग आणि उद्योगपती हेच कोट्यवधी रुपये कमावणार का” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

ही यात्रा राजकारणाच्या पलीकडे आहे. हा राज्यातील विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांनी विचार मांडावेत म्हणून उभारण्यात आलेला मंच आहे. ही सभा एका सेमिनारप्रमाणे आहे. यामध्ये शेकडो लोक सहभागी होणार आहेत, असेही बिरेंद्रसिंह यांनी सांगितले.

सभेमागे २०२४ सालची लोकसभा निवडणूक?

दरम्यान, बिरेंद्रसिंह हे २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यासाठीच त्यांनी ही सभा आयोजित केल्याचे म्हटले जात आहे. ते हरियाणातील हिसार येथून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत बिरेंद्रसिंह यांना भाजपाचे नेते कुलदीप बिश्नोई यांचे आव्हान असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जननायक जनता पार्टीचे नेते तथा हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हेदेखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत हिसार मतदारसंघातून बिरेंद्रसिंह यांचे पुत्र ब्रिजेंद्रसिंह यांनी दुष्यंत, तसेच कुलदीप बिश्नोई यांचे पुत्र भाव्या बिश्नोई यांना पराभूत केले होते. त्याच वर्षात विधानसभा निवडणुकीत दुष्यंत यांनी बिरेंद्रसिंह यांची पत्नी प्रेम लता (भाजपा) यांना उछाना कलान या जागेवर पराभूत केले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana bjp leader chaudhary surendra singh organise rally without bjp banner and flag prd