ED files charge sheet against Aishwarya Gowda : उपमुख्यमंत्र्याची बहीण असल्याचे सांगून श्रीमंत लोकांची फसवणूक करणाऱ्या ३३ वर्षीय कथित व्यावसायिकेला केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. या घटनेमुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली. ऐश्वर्या गौडा असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून सध्या तिची कसून चौकशी केली जात आहे. या महिलेची तीन कोटी ९८ लाख रुपयांच्या संपत्तीही ईडीने जप्त केली आहे, ज्यामध्ये दोन कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता (फ्लॅट्स, बांधलेली इमारत व जमीन) आणि एक कोटी ९७ लाख रुपयांच्या जंगम मालमत्तेचा (रोख रक्कम व वाहन) समावेश आहे. यासंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ईडीने उपमुख्यमंत्र्यांनाही चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. दरम्यान, ही फसवणूक नेमकी कशी उघडकीस आली? या महिलेचा उपमुख्यमंत्र्यांबरोबर नेमका काय संबंध आहे? ते जाणून घेऊ…
दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, एप्रिल महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ३३ वर्षीय कथित व्यावसायिका ऐश्वर्या गौडा हिला अटक केली. काँग्रेसचे नेते व कर्नाटकचे विद्यमान उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची बहीण असल्याचे सांगून बंगळुरूमधील अनेक श्रीमंत लोकांची फसवणूक केल्याचा आरोप ऐश्वर्यावर करण्यात आला आहे. हे प्रकरण उघडकीस येताच राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावल्यानंतर उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार हे सोमवारी (तारीख २३ जून) चौकशीसाठी हजर झाले. जवळपास पाच तासांच्या चौकशीनंतर त्यांनी माध्यमांबरोबर संवाद साधला.
नेमकं काय म्हणाले डी.के शिवकुमार?
माध्यमांबरोबर संवाद साधताना उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार म्हणाले, अंमलबजावणी संचालनालयाने मला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. कारण – राज्यातील फसवणूक झालेल्या अनेक लोकांनी या प्रकरणात माझे नाव घेतले होते. यासंदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला काही प्रश्न विचारले आणि मी त्या प्रश्नाची उत्तरे देऊन त्यांना सहकार्य केले. मला पुन्हा ८ जुलैला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.”
चिट फंड योजनेच्या नावाखाली फसवणूक
मांड्याच्या मळवळी तालुक्यातील रहिवासी असलेल्या ऐश्वर्या गौडाने सुरुवातीला आपल्या जिल्ह्यातील श्रीमंत व्यक्तींची चिट फंड योजनेच्या नावाखाली फसवणूक केली. नंतर तिने बंगळुरूमधील लोकांना लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याचं लग्न हरीश के. एन. यांच्याशी झालं असून ती राज्यातील अनेक नामवंत नेत्यांशी आपले संबंध असल्याचा दावा करत होती. यात काँग्रेससह भाजपा आणि जनता दल (Secular) या विरोधी पक्षांच्या नेत्यांचाही समावेश होता. “ऐश्वर्याने अनेक नेत्यांना आपल्या कार्यक्रमात बोलावले होते, त्यामुळे लोकांचा तिच्यावरील विश्वास बसला होता,” असे एका सूत्राने सांगितले.
आणखी वाचा : मतांची टक्केवारी वाढली, पण उमेदवारच पडला; भाजपाला नेमकं कशामुळे येतंय अपयश?
ऐश्वर्याने श्रीमंत व्यक्तींची कशी फसवणूक केली?
- बंगळुरूतील एका सराफा व्यावसायिकाने ऐश्वर्या गौडा विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
- ऐश्वर्याने आठ कोटींच्या सोन्यावर अधिक परतावा देण्याचं अमिष दाखवून फसवणूक केली, असं त्यांनी तक्रारीत म्हटलं.
- पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर आणखी दोन डॉक्टर आणि एका उद्योगपतीनेही ऐश्वर्याने आपली फसवणूक केल्याचा आरोप केला.
- या सर्वांनी तक्रारीत म्हटले की, ऐश्वर्या स्वतःला उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची बहीण असल्याचे सांगितले होते.
- इतकंच नाही तर ऐश्वर्या गोडा ही लवकरात लवकर खासगी कामे करून घेण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचा वापर करीत होती.
- याशिवाय तिने पोलिसांत असलेल्या ओळखीचा वापर करून तक्रारदारांचे कॉल रेकॉर्ड मिळविल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काँग्रेस आमदाराला भेट दिली लक्झरी कार
दरम्यान, एकापाठोपाठ एक तक्रारी दाखल झाल्यानंतर बंगळुरू सिटी पोलिसांनी ऐश्वर्या गौडाला ताब्यात घेतलं. तपासादरम्यान पोलिसांना आढळून आलं की, ऐश्वर्याने काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांना एक लक्झरी कार भेट दिली होती. यानंतर या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालयाकडे (ED) सोपवण्यात आला. ईडीला तपासात असं आढळून आलं की, आमदार कुलकर्णी यांनी ऐश्वर्याला २४ कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं, जे तिने परत केलं नाही. एवढंच नव्हे, तर एका खून प्रकरणात साक्षीदारावर दबाव टाकण्यासाठी सौदा केल्याचा आरोपही तिच्यावर आहे, ज्यात खुद्द कुलकर्णी आरोपी आहेत. ऐश्वर्या काँग्रेस नेते थिब्बेगौडा यांच्याबरोबर ६० कोटी रुपयांच्या व्यवहारातही सहभागी होती, असंही तपासातून निष्पन्न झालं.
आमदार कुलकर्णी म्हणतात – ती फक्त ओळखीची व्यक्ती
काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावत ऐश्वर्या ही फक्त ओळखीची व्यक्ती असल्याचा दावा केला आहे. २४ एप्रिल रोजी ऐश्वर्या गौडाला अटक केल्यानंतर ईडीने विनय कुलकर्णी यांच्याशी संबंधित १४ ठिकाणी छापे टाकले आणि दोन कोटी २५ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांच्या आर्थिक व वैयक्तिक संबंधांबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
ईडीकडून महत्त्वाचे कागदपत्र आणि डिजिटल पुरावे जप्त
एप्रिल २६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका प्रेस नोटमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) म्हटले की, “झाडझडती दरम्यान, चल-अचल मालमत्ता व डिजिटल उपकरणांद्वारे केलेल्या मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपीने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर उच्चभ्रू राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे सांगून त्यांना धमकावले.” याप्रकरणी २१ जून रोजी ऐश्वर्या सहित १८ जणांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : खासदारांवर लग्नाच्या बहाण्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप; कोण आहेत चंद्रशेखर आझाद? प्रकरण काय?
भाजपाने नेमकी का घेतली सावध भूमिका?
या प्रकरणात उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व डी. के. सुरेश यांच्यासह काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांचे नाव समोर आले असले तरी भाजपाने त्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. भाजपामधील एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, “ऐश्वर्या गौडा हिचे व्यक्ती सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संपर्क होते. तिने भाजपा नेत्यांची नावे वापरूनसुद्धा अनेक फसवणुका केल्याचे बोलले जाते. त्यामुळे विरोधकही हा मुद्दा उचलण्यात फारसे इच्छुक नाहीत.”
काँग्रेसमध्ये अंतर्गत कुरघोडी, अद्याप अधिकृत प्रतिक्रिया नाही
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यामधील गटबाजी स्पष्ट असताना काँग्रेसने या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. काँग्रेसमधील एका गटातील सूत्रांनी सांगितले की, डी. के. बंधूंचं नाव या प्रकरणात आल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा गट सुखावलेला आहे. कारण – यामुळे मुख्यमंत्र्यांची राज्यावर असलेली पकड आणखी मजबूत होईल, अशी त्यांची धारणा आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने ईडीची ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. “भाजपाने अनेकदा केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात अटक झालेल्या महिलेचे काँग्रेसच्या नेत्यांबरोबर घनिष्ठ संबंध होते का? हे जोपर्यंत उघड होत नाही, तोपर्यंत यावर प्रतिक्रिया देणे अयोग्य ठरेल. शिवाय, ऐश्वर्या गौडा हिचे भाजप नेत्यांबरोबरचे फोटोही उपलब्ध असल्याने भाजपही या प्रकरणात फारसे बोलणार नाही,” असं काँग्रेसच्या नेत्याने स्पष्ट केलं आहे.