मुंबई : मराठा समाजास इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण देण्याबाबत विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी कोणाच्या सांगण्यावरून ऐनवेळी बहिष्कार टाकला याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची आणि विरोधकांनी मराठा तसेच इतर मागास समाजाची माफी मागण्याची मागणी करीत बुधवारी सत्ताधाऱ्यांनीच विधिमंडळाच्या उभय सभागृहात गोंधळ घालत कामकाज रोखले. विशेष म्हणजे या वेळी विरोधक शांतपणे बसून असताना सत्ताधारी सदस्यांच्या गोंधळात काही मंत्रीही आघाडीवर होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि इतर मागास समाजामध्ये निर्माण होत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी टाकलेल्या बहिष्काराचे पडसाद बुधवारी विधिमंडळात उमटले. प्रश्नोत्तराचा तास संपताच सत्ताधारी आमदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेत सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी का आणि कोणाच्या सांगण्यावरुन बहिष्कार टाकला अशी विचारणा करीत गोंधळाला सुरुवात केली. विरोधकांना दोन समाजांत भांडणे लावून मतांचे राजकारण करायचे असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. तसेच त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही बोलण्यापासून रोखले. सत्ताधाऱ्यांच्या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. या गोंधळात भाजपाचे मुंबईतील आमदार आक्रमक झाले होते.

हेही वाचा >>> शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम; भाजपला दूर ठेवण्याची दक्षता!

भाजपचे अमित साटम यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर विरोधकांनी टाकलेल्या बहिष्काराचा मुद्दा उपस्थित केला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक सभागृहात आणि बाहेर वेगळी भूमिका घेत असून त्यांनी मराठा समाजास ओबीसीमधून आरक्षण देण्याबाबतची भूमिका जाहीर करण्याचे आव्हान साटम यांनी दिले. विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचे आहे. त्यांना मराठा तसेच ओबीसी समाजाशी काही देणे-घेणे नसल्याचा आरोप साटम यांनी केला.

मराठा आरक्षणाचे खरे शत्रू कोण हे आता मराठा समाजाने ओळखावे. चार वेळा मुख्यमंत्री राहूनसुद्धा एकदाही मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही. केवळ मताचे राजकारण करत समजा समाजात दुही माजवयाची आणि आपली राजकीय समीकरणे मांडायची अशी बोचरी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांचे नाव न घेता केली. या बैठकीला जाऊ नका असा कोणाचा एसएमएस आला आणि विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला, यामागचा बोलविता धनी कोण याची चौकशी झाली पाहिजे, सत्य समोर आले पाहिजे अशी मागणी आशीष शेलार यांनी केली. या प्रकरणात विरोधकांनी मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. तर या बैठकीला विरोधकांनी येतो अशी ग्वाही दिली होती. मात्र त्यांनी जाणीवपूर्वक बहिष्कार टाकला. त्यांना समाजाविषयी काही देणेघणे नाही असा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला.

महायुतीचा घाबरून थयथयाट वडेट्टीवार

मराठा आणि ओबीसी समाजात महायुतीनेच तेढ निर्माण केला आहे. आरक्षणाचा प्रश्न या सरकारला सोडवायचा नाही. हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने सभागृहात भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित आहे. त्यामुळे जनतेला आरक्षणाबाबतची माहिती मिळू शकते. परंतु सरकारला जनतेला अंधारात ठेवायचे आहे. पितळ उघडे पडेल म्हणून महायुतीचा थयथयाट असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. सरकारचा भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांना आम्ही वाचा फोडत आहोत. तसेच आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारचे बिंग फूटू नये यासाठी सत्ताधाऱी गोंधळ घालून सभागृहाचे काम बंद पाडत आहेत. विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly council adjourned over maratha reservation issue print politics news zws