उत्तर प्रदेशच्या लखनऊ मधील समाजवादी पक्षाच्या मुख्यालयाच्या बाहेर झळकलेल्या एका जुन्या बॅनरचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या बॅनरवर अखिलेश यादव यांचा भावी पंतप्रधान असा उल्लेख करण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या बॅनरचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर सदर बॅनर लावलेले दिसत असून पक्षाचे प्रवक्ते फखरुल हसन चांद यांनी हे बॅनर लावले आहे. अशाचप्रकारचे बॅनर यावर्षी जुलै महिन्यात अखिलेश यादव यांना ५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशाप्रकारचे बॅनर लावण्यामागे नेमका हेतू काय? असा प्रश्न एएनआय वृत्तसंस्थेने चांद यांना विचारला असता ते म्हणाले, “समाजवादी पक्षाचे नेते आणि सर्व कार्यकर्त्यांची ही इच्छा आहे की, अखिलेश यादव यांनी देशाचे पंतप्रधान बनावे. “नेताजींनी (दिवंगत नेते मुलायम सिंह यादव) देशाचे पंतप्रधान बनावे, असे आमचे स्वप्न होते. पण ते अपुरेच राहिले. त्यामुळे अखिलेश यांच्या रुपात आमचे हे स्वप्न पूर्ण होवो, अशी सर्वांची इच्छा आहे.”

चांद पुढे म्हणाले की, इंडिया आघाडीने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप पंतप्रधान पदासाठी उमेदवार घोषित केलेला नाही. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, अखिलेश यादव यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्यात यावे. भाजपाला पराभूत करण्याचा दावा कुणीही करू शकतो. मात्र हे करून दाखविण्याची धमक फक्त समाजवादी पक्षातच आहे.

हे वाचा >> काँग्रेस-समाजवादी पार्टीतील वाद मिटणार? अखिलेश यादव यांनी दिले संकेत; म्हणाले, “काँग्रसेच्या सर्वोच्च नेत्याचा…”

भाजपाकडून सपाला चिमटा

दरम्यान, भाजपाचे नेते आणि आणि उत्तर प्रदेशचे मंत्री दानिश आझाद अन्सारी यांनी “मुंगेरी लाल के हसीन सपने” अशी शेलकी प्रतिक्रिया देत चांद आणि समाजवादी पक्षाला टोला लगावला. “आपण दिवास्वप्न पाहण्यापासून आपण कुणालाही रोखू शकत नाही, पण प्रत्येकाने आपल्या क्षमता तपासल्या पाहीजेत. ज्याच्यात क्षमता आहे, तोच या पदावर पोहचू शकतो”, अशी कोपरखळीही त्यांनी दिली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने विकासाच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. देशातील लोकांचा मोदींवर विश्वास आहे आणि देशातील जनता तिसऱ्यांदा त्यांनाच देशाचे पंतप्रधान म्हणून निवडेल”, असा विश्वास अन्सारी यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केला.

इंडिया आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस आणि समाजवादी पक्षात अलीकडे वाद निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा बॅनरचा नवा वाद समोर आला आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा करण्यात काँग्रेस पक्षाने उशीर केल्याबाबत यादव यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यादव असेही म्हणाले की, इंडिया आघाडीपेक्षाही आमचे अधिक लक्ष पीडीए म्हणजे “पिछडा (मागासवर्गीय), दलित आणि अल्पसंख्याक” यांच्याकडे आहे.

अखिलेश यादव काय म्हणाले?

“फक्त बॅनर लावून कुणी देशाचा पंतप्रधान होत नाही. जर एखाद्या पदाधिकारी किंवा समर्थकाने असे बॅनर लावले असेल तर त्याने फक्त त्याच्या मनातली इच्छा व्यक्त केली आहे. समाजवादी पक्षाचा मुख्य हेतू भाजपाला रोखणे एवढाच आहे”, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एएनआयशी बोलताना दिली.

अखिलेश यादव यांनी शनिवारी काँग्रेसला इशारा देताना म्हटले की, काँग्रेसने समाजवादी पक्षाचा विश्वासघात करू नये आणि आघाडी करणार की नाही याबाबतची स्पष्ट भूमिका मांडावी. “काँग्रेस पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याकडून मला निरोप मिळाला आहे. जर त्यांच्याकडून काही पर्याय आले, तर त्याचा मी नक्कीच विचार करेन. पण त्यांना जर आमच्याशी आघाडी नको असेल, तर आमच्याशी ते संपर्क का साधत आहेत?” अशी प्रतिक्रिया देत असताना अखिलेश यादव यांनी काँग्रेस नेत्याचे आणि दिलेल्या निरोपाची मात्र वाच्यता केली नाही.

भाजपाचे प्रवक्ते अवनीश त्यागी याविषयी प्रतिक्रिया देताना म्हणाले, “उत्तर प्रदेशच्या लोकांनी अखिलेश यादव यांना सपशेल नाकारले आहे. त्यांच्या पक्षाला इतर राज्यातही फारसा पाठिंबा नाही. त्यांचे सहकारी पक्षही त्यांच्यापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीतही जर ते पंतप्रधान पदाचे बॅनर लावत असतील तर ते ‘मुंगेरी लाल के हसीन सपने’ याशिवाय दुसरे काही असू शकत नाही.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mungeri lal ke hasin sapne bjp mocks future pm akhilesh yadav hoarding in lucknow kvg