सुहास सरदेशमुख

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केवळ चांगल्या खात्याचे मंत्रीपदच नाही, तर औरंगाबादचे पालकमंत्रीपद आपल्याकडे असावे यासाठी आमदार अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि संजय शिरसाठ यांच्यात रस्सीखेच सुरू असून मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर गाड्या भरून कार्यकर्ते नेण्याचा प्रकार पालकमंत्रीपदासाठीची रस्सीखेच असल्याचे मानले जात आहे. तर हीच राजकीय कृती शिवसेनेतील फूट किती रुंदावली आहे, हे सांगण्यासाठी असल्याचे सांगण्यात येत आहे.औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील विविध विकास कामांना तत्कालीन नगरविकास मंत्र्यांनी दिलेला निधी, मतदारसंघात भेट देऊन केलेली उद्घाटने यामुळे आमदार संजय शिरसाट हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे अशी त्यांची प्रतिमा. बंडाळीनंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून पत्र लिहित शिरसाठ यांनी शिवसेनेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे शिंदे गटातील बंडखोर आमदार गटाचे ते महत्त्वाचे नेते असल्याची प्रतिमा निर्माण करण्यातही त्यांना यश मिळाले. आता मंत्रीपद मिळावे आणि त्यात यश आले तर पालकमंत्री म्हणून नियुक्ती व्हावी म्हणून त्यांचे समर्थक मुंबई दरबारी शक्तीप्रदर्शनासाठी गेले असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. तसा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

गुवाहाटी येथे घडणाऱ्या बैठकांमधील तपशील माहीत असणारे सत्तार हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. नव्या सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री म्हणून बढती मिळावी असे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्यांचे समर्थक मुंबई येथील शक्तिप्रदर्शनात सहभागी झाले आहेत. सिल्लोड मतदारसंघाचा जिल्ह्याच्या राजकारणावर पगडा असावा असे प्रयत्न राज्यमंत्री सत्तार नेहमी करत असत. अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्येही त्यांचा मोठा वाटा असल्याची उघड चर्चा होती. शिवसेनेतील नेत्यांना न विचारता पक्षप्रमुखांचे नाव घेऊन राज्यमंत्री सत्तार माध्यमांमध्येही उलट-सुलट प्रतिक्रिया देत असत. त्यामुळे तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाईही त्यांच्यावर वैतागत. राज्यमंत्री सत्तार मात्र निर्णय रेटून नेत. आता मंत्रीपद मिळाल्यास पालकमंत्रीपदही हवे यासाठी शक्तीप्रदर्शनाचा घाट घातला जात असल्याचा आरोप शिवसेना नेते करत आहेत.

रोजगार हमी मंत्री म्हणून काम करणारे संदीपान भुमरे यांनाही मंत्रीपदाबरोबरच औरंगाबादचे पालकमंत्रीपद मिळावे अशी आस असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. मंत्रीपद तर मिळेलच असा दावा करत आता औरंगाबादमधील तिघे आता पालकमंत्रीपदासाठी शक्तीप्रदर्शन करत आहेत. तर बंडाळीनंतर आपल्या मतदारसंघातून शिवसेनेत किती फूट पडली आहे, हे दर्शविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबई येथे गाड्या भरून नेले जात आहेत. या गाड्यांमध्ये कोण कोण बसून गेले, याची नावे आता शिवसेना नेतेही रोज नोंदवू लागले आहेत. गुरुवारी सकाळी मुंबईत जाणाऱ्या संजय शिरसाट यांच्या समर्थकांच्या गाडीत करोडी भागातील काही पदाधिकारी होते. बजाजनगर या औद्योगिक वसाहतीमधील तसेच पश्चिम मतदारसंघातील शहराजवळील काही छोट्या गावातून कोणीही गेले नाही, असा शिवसेना नेत्यांचा दावा होता. प्रत्येक वाॅर्डातून कोणता कार्यकर्ता कोणाकडे आहे यावरही लक्ष ठेवले जात आहे. शक्तीप्रदर्शनाच्या निमित्ताने शिवसेनेतील फूट रुंदावत जावी असे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. तर दुसरीकडे उत्तर म्हणून युवा सेनेच्या माध्यमातून निष्ठा मेळावेही घेतले जात आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat and abddul sattar both are interested for the post gradian minister of aurangabad pkd