उत्तर प्रदेशमध्ये ४ आणि ११ मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सहारनपूर येथे सभा घेऊन प्रचारसभा घेतली. या वेळी त्यांनी उत्तर प्रदेशमधील माफिया राजचे कंबरडे मोडले असल्याचे सांगितले. “उत्तर प्रदेशमध्ये २०१७ पूर्वीचे सरकार केवळ दंगली घडविणे आणि माफियांचे लांगुलचालन करण्याचे काम करत होते. मात्र त्यानंतर भाजपा सरकारने कायद व सुव्यवस्था कशी आदर्शवत असावी, हे दाखवून दिले. आता इतर राज्येही आपला कित्ता गिरवताना दिसत आहेत. आज उत्तर प्रदेशमधील नागरिक भयमुक्त जीवन जगत आहेत,” अशा शब्दात योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, आधीचे सरकार असताना सतत होणाऱ्या दंग्यांमुळे राज्यातील अनेक ठिकाणी नेहमी कर्फ्यू लागलेला असायचा. मात्र आता धार्मिक यात्रेसाठी राज्य ओळखले जाते. राज्यात मोठ्या उत्साहात कावडयात्रा सुरू आहेत. पश्चिम यूपीमध्ये हजारो लोक न घाबरता यात्रेत सामील झाले असून त्यांच्याकडून पूजाअर्चा सुरू आहेत. “शहरातील गल्लीबोळांत गुन्हेगारांचा गोळीबार हवा आहे की, भजनाचे स्वर ऐकू यायला हवेत, हे आपल्याला आता ठरवावे लागेल. युवकांच्या हातात बंदूक असावी की टॅब, हेदेखील ठरवा,” असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.

योगी आदित्यनाथ लोकांना आवाहन करताना म्हणाले की, तुम्हाला खंडणी मागणारे गुंड हवे आहेत की, तुमच्या कामासाठी सदैव तत्पर राहणारे प्रशासन हवे आहे. उत्तर प्रदेशमध्ये आता खंडणी उकळणे आणि धमकी देणे चालणार नाही. हे राज्य कुणाची जहागीर नाही. सोमवारी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.

हे वाचा >> VIDEO : “ना कर्फ्यू, ना दंगा, उत्तर प्रदेशात आता…”, योगी आदित्यनाथ यांचं प्रचारसभेत वक्तव्य

सहारनपूरमधील शामली जिल्ह्यातील व्हीव्ही आंतर महाविद्यालय मैदानावर योगी आदित्यनाथ यांनी जाहीर सभेला संबोधित केले. या वेळी ते म्हणाले, “केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील योगी सरकार एकत्रितपणे राज्यातील विकासकामे डबल इंजिन लावून वेगाने करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आपल्याला शहरे, छोटी शहरे यांचाही जलदगतीने विकास साधायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेतील तिसऱ्या इंजिनचीही शक्ती लागेल. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना मतदान करून विजयी करा.”

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, “तुम्ही मागच्या सरकारच्या काळात कैराना येथून व्यापाऱ्यांनी केलेले पलायन विसरला नसाल अशी मला आशा आहे. त्या ठिकाणी युवकांसाठी रोजगार नाहीत. कायद्याची भीती न बाळगता गुंड दिवसाढवळ्या खंडणी वसूल करतात. मात्र उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे सरकार आल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. आता दंगली नाहीत, गुंडांची हप्तेखोरी नाही. कैरानामध्ये केवळ आता भरभराट होईल.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogi launches bjps civic polls campaign decide if you want gunshots in streets or prayers kvg