काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. अंबानी यांच्या अॅन्टिलिया या निवासस्थानी जी स्फोटके सापडली होती, ती फडणवीसांनीच ठेवली होती, असा मोठा आरोप नाना पटोले यांनी केला. नाना पटोलेंच्या या आरोपावर आज देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.” २६/११ चा दहशतवादी हल्ला नाना पटोलेंनी केला असं स्टेटमेंट द्यावं का अशी माझी इच्छा झाली आहे”, असं फडणवीस म्हणाले. ते पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करणे, अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणे हे सगळं महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी ठरवून केलं होतं. त्यामागे देवेंद्र फडणवीस होते मी ते विधानसभेतही म्हटलं होतं. आता ते स्पष्ट झालं आहे”, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी १६ मे रोजी केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याच शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.

“नाना पटोलेंना तर अवॉर्ड दिला पाहिजे, ते म्हणाले अंबानीच्या घरापुढे स्फोटके मीच ठेवली. आता मला इच्छा झाली आपण एक स्टेटमेंट द्यावं की २६/११ दहशतवादी हल्ला नाना पटोलेंनीच केला. माझा सवाल आहे की, वाझेला पोलीस दलामध्ये परत कोणी घेतला? हा वाझे, पोलीस दलात परत येण्याकरता २०१७ साली उद्धव ठाकरेंनी माझ्याकडे पाठवला. मंत्री आले माझ्याकडे, दबाव आणला की साहेबांनी आग्रह धरला आहे. काहीही झालं तरी वाझेला पोलीस दलात परत घ्या. पण मी म्हटलं की, वाझेला मी परत घेणार नाही आणि फाईलवर लिहिलं की मी परत घेणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >> “मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकं ठेवण्याची कल्पना फडणवीसांचीच” नाना पटोलेंचा गंभीर आरोप

“उद्धवजींचं सरकार आल्यानतंर वाझेला पोलीस दलात परत घेतलं. त्यानंतर हा वाझे कुठे असायचा? वर्षावर नाहीतर मातोश्रीवर. हा कोणाचा वाझे होता? आणि आता परमबीर सिंगांनी तुमच्यावर आरोप केले यात आमची काय चूक? परबमीर सिंगांना आयुक्त कोणी केला? ठाकरेंनी. आरोप केल्यावर काढलं कोणी? उद्धव ठाकरेंनी. वाझेच्या माध्यमातून वसुलीचं रॅकेट उघडलं. त्याच्या जबानीतून सगळं पुढे आलं, असंही फडणवीस पुढे म्हणाले.

“यांचं रॅकेट मी बाहेर काढलं नसतं, मनसूख हिरेनची हत्या मी बाहेर काढली नसती तर हे सगळं यांनी पचवून टाकलं असतं. विरोधी पक्षनेता म्हणून मनसूख हिरेनची हत्या शोधून काढली. त्यामुळे यांचं रॅकेट पुढे आलं, नाहीतर हे असेच हजारो कोटी रुपये कमावून राहिले असते, असंही फडणवीस म्हणाले. पुढे ते म्हणाले की, “पण मी नाना भाऊंचे आभार मानतो. नाना भाऊ माझा खऱा मित्र आहे. नानाभाऊला माहितेय की ही गोष्ट लोकांना विसरूच द्यायची नाही. लोकं विसरले की नानाभाऊ हा विषय काढतातच. त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 26 11 bombings were done by nana patole devendra fadnavis response to that allegation sgk