भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे गुन्हे दाखल झाले आहेत. यावर मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे अतिरेकीपणा आहे,” असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलं. तसेच या आरोपीचा खटला आमची टीम मोफत लढेल, अशी घोषणाही केली. त्यांनी रविवारी (११ डिसेंबर) ट्वीट करत आपली भूमिका मांडली.
वकील असीम सरोदे म्हणाले, “शाईफेक प्रकरणात कलम ३०७ म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि १२० ब, शस्त्रास्त्र कायद्याचा वापर करणे यानुसार गुन्हा दाखल करणे अतिरेकीपणा आहे.”
“यंत्रणांच्या मदतीने कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे. त्यामुळे आमची कायदेशीर टीम आरोपींची केस मोफत चालवेल. परंतु, शाईफेकीचा व बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध,” असंही असीम सरोदे यांनी नमूद केलं.
“मी अनावश्यक कलमांचा वापर करण्याचा विरोधात”
असीम सरोदे पुढे म्हणाले, “मी अनावश्यक कलमांचा वापर करण्याचा विरोधात आहे. कलम ३२६ शस्त्राचा वापर करून गंभीर दुखापत करणे या गुन्ह्यासाठीही १० वर्षे (किंवा जन्मठेप) अशी शिक्षा होऊ शकते. मग शाईफेकीसाठी कलम ३०७ जीवे मारण्याचा प्रयत्न हे कलम का लावायला सांगण्यात आले? इतकाच प्रश्न आहे.”
“आरोपींचा खटला मोफत चालवणार”
“शाई फेकणे, बूट किंवा चप्पल फेकणे हा ‘इन्स्टंट’ न्यायाचा प्रकार”
“कुणावर तरी शाई फेकणे, बूट किंवा चप्पल मारून फेकणे हा राग व्यक्त करण्याचा ‘इन्स्टंट’ न्याय हवा असण्याचा प्रकार लोकशाहीत बसत नाही. चंद्रकांत पाटलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण त्यांनी ज्या प्रकारे स्वतःचे मत मांडले तो अभिव्यक्तीचा गैरवापर व चुकीची अभिव्यक्ती आहे. ते गैरवर्तन आहे,” असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलं.
“अनावश्यक कलमे लावणे हा न्यायतत्वाचा अपमान”
“शाईफेक प्रकरण म्हणजे गैरवर्तनाला गैरवर्तनाने उत्तर देण्याचा अराजकता निर्माण करण्याचा प्रकार आहे. दुसरीकडे सत्तेचा वापर करून अनावश्यक कलमे लावणे हा न्यायतत्वाचा अपमान आहे, असंही असीम सरोदे यांनी नमूद केलं.
हेही वाचा : Video: पुण्यात चंद्रकांत पाटलांवर शाईफेक; ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ची घोषणाबाजी करत फेकली शाई
“सरकार तालिबानींसारखे वागू लागले आहे”
या प्रकरणावर राजू शेट्टींनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “शाईफेकीचे समर्थन करणे चुकीचे आहे, पण शाई फेकणाऱ्या युवकावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते पाहता सरकार तालिबानींसारखे वागू लागले आहे असे वाटते. ३०७ म्हणजे धारदार शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न आणि ३५३ म्हणजे सरकारी कामात अडथळा याचा अर्थ महापुरुषांचा अपमान करणे हे सरकारी काम आहे का?”
हेही वाचा : Photos : “शिंदे-फडणवीसांना हात जोडून विनंती आहे की…”, शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
“सरकारने ७०० हून अधिक शेतकऱ्यांचा बळी घेतला, त्यांच्यावर ३०२ कलम का लावले नाही?”
“मग हा कायदा दिल्लीतील शेतकरी आंदोलनात ज्या सरकारने ७०० हून अधिक शेतकऱ्यांचा बळी घेतला त्याला जबाबदार असणाऱ्यांवर ३०२ सह ही कलमे का लावण्यात आले नाहीत?” असा प्रश्न राजू शेट्टींनी विचारला.