पुणे : Talathi recruitment 2023 तलाठी भरती परीक्षेसाठी यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे ही परीक्षा घेताना प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे. परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी उमेदवारांना परीक्षेसाठी जाताना कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी घालण्यात आली असून, परीक्षा केंद्रांवर जाताना करण्यात येणाऱ्या तपासणीत इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडल्यास तातडीने संबंधित उमेदवारांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा भूमी अभिलेख विभागाने दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 राज्यभरात तलाठी पदासाठी चार हजार ४६६ जागांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. त्याकरिता दहा लाख ४० हजार ७१३ असे विक्रमी अर्ज छाननीअंती दाखल झाले. १७ ऑगस्टला सुरू झालेली ही १४ सप्टेंबपर्यंत होणार आहे. आतापर्यंत १७, १८, १९, २०, २१ आणि मंगळवारी २२ ऑगस्ट असे सहा दिवस तीन सत्रांत राज्यभरात परीक्षा झाली. त्यामध्ये राज्यात काही ठिकाणी पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सोमवारी (२१ ऑगस्ट) तांत्रिक कारणांमुळे परीक्षा दोन तास विलंबाने सुरू झाली. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, म्हणून काटेकोर नियोजन करत उमेदवारांनी परीक्षा केंद्रांवर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी घातली आहे.

अप्पर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते म्हणाले, की तलाठी भरतीची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांना परीक्षा केंद्रावर इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी केली आहे. त्याबाबत उमेदवारांना यापूर्वीच कळवण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान काही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी परीक्षा केंद्रांवर तपासणीदेखील करण्यात येत आहे. या तपासणीत कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू निदर्शनास आल्यास संबंधितांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, ऑनलाइन परीक्षा नको असणाऱ्या घटकांकडून उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, टीसीएस कंपनीचा अधिकारी यांची समिती केली आहे. अनुचित घटना घडल्यास थेट कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही रायते यांनी सांगितले.

अशी होईल परीक्षा

पहिल्या टप्प्यातील १७ ते २२ ऑगस्टपर्यंत परीक्षा पार पडली आहे. आता परीक्षेचा दुसरा टप्पा २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत, तर तिसरा टप्प्यात ४ ते १४ सप्टेंबर या कालावधीत राज्यभरातील विविध केंद्रांवर परीक्षा होणार आहे. २३, २४, २५ ऑगस्ट, तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या दिवशी परीक्षेचे नियोजन करण्यात आलेले नाही, असेही भूमी अभिलेख विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ban on carrying electronic items to examination centers for talathi recruitment ysh