पुणे : बरोब्बर साठ वर्षांपूर्वी एका मराठी खगोलशास्त्रज्ञाने त्याच्या मार्गदर्शकाच्या जोडीने गुरुत्वाकर्षणासंबंधीचा एक नवा सिद्धान्त मांडला आणि तेथून पुढे विश्वनिर्मितीच्या रहस्यावरील संशोधनाला चालना मिळाली. या गुरू-शिष्य द्वयीने विश्वनिर्मितीच्या रहस्यावरील प्रचलित बिग बँग सिद्धान्तावर काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले, ज्यांची उत्तरे संशोधक अजूनही शोधत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी विश्वनिर्मितीच्या रहस्याबाबत केलेल्या संशोधनामुळे अनेक मूलभूत गोष्टींवर प्रकाश तर पडलाच. पण, त्याच बरोबरीने या क्षेत्रात संशोधनाच्या अनेक वाटा खुल्या झाल्या. त्यामुळे डॉ. नारळीकर यांचे संशोधन अनमोल असून, त्याच्या आधारावरच पुढील अभ्यास होत असल्याने हे संशोधन आजही समकालीन आहे…’

हेही वाचा…पुणे : नशेसाठी मोबाइल चोरून केला ज्येष्ठाचा खून

डॉ. जयंत नारळीकर यांनी ११ जून १९६४ रोजी गुरुत्वाकर्षणासंबंधीचा सिद्धान्त मांडला. त्यातूनच पुढे विश्वप्रसरण आणि विश्वनिर्मितीच्या रहस्यावरील संशोधनाला चालना मिळाली. त्यास आज, ११ जून रोजी, मंगळवारी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने या संशोधनाचे महत्त्व आणि समकालीनत्व या विषयावर नारळीकर यांचे सहकारी आणि मुंबई येथील नेहरू तारांगणाचे संचालक डॉ. अरविंद परांजपे यांनी प्रकाशझोत टाकला.

परांजपे म्हणाले, ‘महास्फोटाच्या (बिग बँग) सिद्धान्ताकडे गणितीय संकल्पनेच्या पृष्ठभूमीतून पाहिले गेले होते. पण, काही निरीक्षणांतून हे दिसून आले, की आपल्या आकाशगंगा इतर आकाशगंगांपासून दूर चालल्या आहेत. ‘विश्वाची निर्मिती एका महास्फोटाने झाली असेल, तर एके काळी या सगळ्या एका ठिकाणी असल्या पाहिजेत,’ असे नारळीकर यांचे मार्गदर्शक फ्रेड हॉयल यांनी जरा उपरोधानेच म्हटले होते. मात्र, अनेक खगोलशास्त्रीय निरीक्षणे अशी दिसू लागली, की ज्यामुळे विश्वाची निर्मिती ३८.८ अब्ज वर्षांपूर्वी झाली असावी, यावर लोकांचा विश्वास बसू लागला. पण, जर तेव्हा निर्मिती झाली होती, तर त्याआधी काय होते, यावर नारळीकर आणि हॉयल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यातूनच पुढील संशोधन झाले आणि नंतर गेल्या काही वर्षांतील निरीक्षणांतून लक्षात आले, की काही आकाशगंगांचे वय पाहिले, तर त्या ‘बिग बँग’च्या वेळी आल्या कोठून, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.’

हेही वाचा…शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेशवाटप अशक्यच!

परांजपे म्हणाले, ‘बिग बँगवर प्रश्न उपस्थित झाला, तरी नारळीकर यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मात्र ‘बिग बँग’ सिद्धान्ताचे संशोधन करण्यापासून परावृत्त केले, असे झाले नाही. तसे केले, तर त्यांचे शोधनिबंधच कदाचित प्रसिद्ध होणार नाहीत, असा त्यातील धोका होता.’

विश्वनिर्मितीच्या रहस्यावर अजूनही संशोधन सुरूच

‘विश्व प्रसरण पावते आहे, हे लक्षात आल्यामुळेच फ्रेड हॉयल यांनी त्याला ‘बिग बँग’ म्हटले. पण, या संदर्भात कृष्ण ऊर्जा (डार्क एनर्जी) आणि कृष्ण वस्तुमान (डार्क मॅटर) या विषयावर गेल्या १५ वर्षांत अधिक संशोधन सुरू झाले आहे. संशोधनाचा हा न संपणारा विषय आहे. वेगवेगळे शास्त्रज्ञ समीकरणे मांडून आणि त्याच्या जोडीला निरीक्षणांची जोड देऊन संशोधन परिपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करीत आहेत,’ याकडे डॉ. अरविंद परांजपे यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा…Pune Porsche Accident : अगरवाल दाम्पत्यासह तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ

विश्वनिर्मितीच्या संशोधनाचा जो इतिहास आहे, तो गेल्या ६०-७० वर्षांतील आहे. विश्वाच्या एकूण पसाऱ्यामध्ये ती क्षुल्लक बाब आहे. विश्वाची निर्मिती कशी झाली असेल, या संदर्भात येणारा काळच सांगेल. त्यासाठी कदाचित आणखी ५०-६० वर्षे जाऊ द्यावी लागतील, असेही डॉ. अरविंद परांजपे म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrating 60 years of big bang theory model by dr jayant narlikar pune print news vvk 10 psg