पुणे : ‘व्होकल फॉर लोकल’ तसेच ‘मेक इन इंडिया’ अशी फसवी भाषा केंद्रात सत्ता असलेल्या मोदी सरकारने बंद करून सुक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योजकांना तातडीने १५ टक्के सबसिडी चालू करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.
केंद्र सरकारकडून लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योजकांना यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी आणि अद्ययावत करण्यासाठी १५ टक्के सबसिडी दिली जात होती. लघु उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी या सबसिडीतून हातभार मिळत होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून अचानकपणे सबसिडी बंद केल्यामुळे या उद्योजकांसमोर भांडवल उभारणी आणि अन्य कामांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणी तातडीने दूर करण्याची गरज आहे. तसेच राज्य सरकारकडून सुक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योजकांना मिळणाऱ्या ५ टक्के सबसिडीत वाढ करावी, अशी मागणीही जोशी यांनी केली आहे.