पुणे : जागतिक तापमानावाढीमुळे अंटार्क्टिका खंड आणि एव्हरेस्ट शिखरावरील बर्फ आणि हिमनद्या वितळत आहे. त्यामुळे तिथे खूप वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत असलेले अनेक जीवाणू आणि विषाणू बाहेर पडण्याच्या स्थितीत आहेत. हे जीवाणू आणि विषाणू प्राणी अथवा मनुष्याच्या संपर्कात येऊन जगभरात रोगाच्या नवीन साथी येतील, असा धोक्याचा इशारा राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेचे (एनआयव्ही) संचालक डॉ. नवीन कुमार यांनी दिला.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

पुणे येथे ‘जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. कुमार बोलत होते. ‘भविष्यात नवीन रोगाच्या साथी येतील. याला प्रामुख्याने जागतिक तापमानवाढ कारणीभूत ठरणार आहे. मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे मनुष्य आणि प्राण्यांमधील संपर्क वाढून साथरोग पसरत आहे. याचबरोबर जागतिकीकरणामुळे जगभरात मानवाचा प्रवास वाढला असून, त्यातून रोगांचा प्रसारही होत आहे,’ असे डॉ. कुमार यांनी नमूद केले. नवीन रोगांच्या साथींना आपण प्रतिबंध करू शकत नाही. मात्र, आपण त्यांचा सामना करण्यास आता सज्ज आहोत, असेही त्यांनी सांगितले.‘आपल्याकडे सध्या काही लस आहेत, तर काही नवीन लशींवर आपण संशोधन करीत आहोत. ‘बर्ड फ्ल्यू’वरील लस विकसित करण्याचे काम सुरू आहे. अमेरिका आणि युरोपकडे या लशींचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. ‘भारतीय वैद्याकीय संशोधन परिषदे’कडून (आयसीएमआर) मंकीपॉक्स, डेंग्यू, चिकुनगुन्या यावरील लस विकसित करण्याचे काम सुरू आहे,’ अशी माहितीही डॉ. कुमार यांनी दिली.

‘बर्ड फ्ल्यू’चा मानवाला संसर्ग

स्थलांतरित पक्षी हिवाळ्यात सैबेरिया आणि मंगोलियातून भारतात दोन ते तीन महिन्यांसाठी येतात. त्यांच्या माध्यमातून नवीन विषाणूंचा संसर्ग जागतिक तापमानवाढीमुळे नवीन साथींचा धोका आपल्याकडे होतो. त्यामुळे पक्ष्यांसह त्यांच्या संपर्कात असलेल्या मनुष्यांचे नमुने तपासण्यात येतात. ‘बर्ड फ्ल्यू’चा संसर्ग हा सिंह, मांजर आणि इतर पाळीव प्राण्यांमध्येही आढळून आला, तेथून तो मनुष्यामध्ये पसरत आहे. आंध्र प्रदेशमध्ये एका लहान मुलीचा ‘बर्ड फ्ल्यू’मुळे नुकताच मृत्यू झाला. तिने कच्चे चिकन खाल्ल्याचे तपासणीत समोर आले,’ असे डॉ. कुमार यांनी अधोरेखित केले.

सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम

तापमानवाढीचे गंभीर परिणाम सध्या सार्वजनिक आरोग्यावर होत आहेत. यामुळे डासांचे २८ दिवसांचे जीवनचक्र २१ दिवसांवर येते आणि त्यातून त्यांची उत्पत्ती वाढते. सध्या डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येमागे हे प्रमुख कारण आहे. थंड हवेच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होत नाही. परंतु, अशा ठिकाणी तापमानात वाढ होऊन डासांची उत्पत्ती वाढत आहे. तिथेही कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. तेथील नागरिकांना आधी असे आजार झालेले नसल्याने त्यांच्यात प्रतिकारशक्ती नसते. त्यामुळे हे आजार वेगाने पसरतात आणि त्यांचा मृत्यूदरही अधिक असतो,’ अशी माहिती निवृत्त राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

आधी रोगाचे निदान करण्याचे आव्हान आपल्यासमोर होते. आता आपण याबाबतीत स्वयंपूर्ण झालो आहोत. कोविड संकटानंतर प्रत्येक वैद्याकीय महाविद्यालयातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झालेली आहे. सुरुवातीला जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी ‘आरटीपीसीआर’ चाचणीची सुविधा असे. आता प्रत्येक वैद्याकीय महाविद्यालयात ही सुविधा उपलब्ध आहे.- डॉ. नवीन कुमार, संचालक, राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Global warming poses threat of new epidemics a warning from the national institute of virology sud 02