राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज पुण्यातील सिंहगडाला भेट दिली. यावेळी स्थानिक महिलांनी राज्यपालांनाच्या स्वागतासाठी रांगोळ्या देखील काढल्या होत्या. तसेच, सिंहगडावर आल्यानंतर या महिलांनी ओवाळून त्यांचं स्वागत केलं. या भेटीदरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यासंदर्भात आपलं मत व्यक्त केलं आहे. “शिवाजी महाराज हे आपल्या देशाचा अभिमान आहेत, स्वाभिमान आहेत”, असं राज्यपाल यावेळी म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवाजी महाराज फक्त भारताचेच नाही, जगाचे हिरो!

“भारतात छत्रपती शिवाजी महाराज एका नव्या अवताराच्या रुपात आले. मोघल साम्राज्याचा अंत करण्यात आणि भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात त्यांनी ज्या बुद्धी, युक्ती आणि शक्तीचा वापर केला आणि राज्य केलं, त्याद्वारे एक प्रकारे एक नवी चेतना देशात जागृत केली. त्यामुळे शिवाजी महाराज हे फक्त भारताचेच नाही, तर जगाचे हिरो बनले आहेत. जगभरातल्या इतिहासकारांनी त्यांच्या सामर्थ्याचं गुणगान केलं आहे”, असं राज्यपाल यावेळी म्हणाले.

स्थानिकांचं स्वागत स्वीकारुन राज्यपाल किल्ल्याकडे मार्गस्थ झाले.

जेवढं तुम्हीही वाचलं नसेल…

दरम्यान, यावेळी राज्यपालांनी आपण शिवाजी महाराजांबद्दल ५० वर्षांपूर्वी वाचन केल्याचं सांगितलं. “मी तानाजी मालुसरे, शिवाजी महाराज, बाजी प्रभू देशपांडे या सगळ्यांविषयी ५० वर्षांपूर्वी वाचलं आहे, जेवढं तुम्ही देखील वाचलं नसेल. कारण शिवाजी हे आपल्या देशाचा अभिमान आहेत, स्वाभिमान आहेत”, असं ते माध्यम प्रतिनिधींना उद्देशून म्हणाले. “शिवाजी महाराज हे आपल्या देशाचे नायक आहेत. देशातील मुलांना सुरुवातीपासूनच शिवाजी महाराजांविषयी, तानाजी मालुसरेंविषयी शिकवलं जायला हवं. असं झालं, तर आपल्या देशातील मुलं देखील तानाजी मालुसरे होऊ शकतील, शिवाजी होऊ शकतील”, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Governor bhagatsingh koshyari visits sinhgad in pune speaks on shivaji maharaj tanaji malusare pmw