पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात पावसाचा जोर ओसरला आहे. या प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चारही धरणांमध्ये मिळून आजमितीस १०.२९ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा असून, गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा ६.७१ टीएमसीने जास्त असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

खडकवासला प्रकल्पातील या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपूर्वी पर्यंत पावसाचा जोर कायम होता. गेल्या चोवीस तासांत पाऊस तुरळक झाल्याची नोंद जलसंपदा विभागाकडून करण्यात आली. सर्वाधिक पाऊस टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १६ मिलिमीटर एवढा नोंदविण्यात आला. वरसागव येथे शून्य तर खडकवासला आणि पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रत्येकी एक- एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्गही कमी करण्यात आला आहे. सध्या सांडव्यावरून २ हजार ७६ क्युसेक असा विसर्ग सुरू आहे. या चारही धरणांमध्ये मिळून १०.२९ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.