वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवूनही नद्यांचा शाश्वत विकास शक्य आहे का?

– होय. सध्या लोकसंख्येचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतो आहे. शहरांमध्ये लोकांना जागा अपुरी पडते, तेव्हा वस्त्यांसाठी नदीकाठची मोकळी जागा शोधली जाते. तेथे बांधकामे केली जातात. सिमेंट काँक्रिटमुळे झरे, ओढे-नाले यांना नदीकडे जाण्यासाठी मोकळी वाट मिळत नाही. पाऊसकाळात पाणी लवकर मुरत नाही, तिथेच साचून राहते. अशा वेळी अनेक ठिकाणी ‘शहरी पुरा’ची स्थिती निर्माण होते. त्यात विकास साधायचा म्हणून वेगवेगळ्या प्रकल्पांची भर पडते. पूर अडवण्यासाठी नदीला भिंत घालण्याचे धोरण आखले जाते. त्याने नदीचे पात्र संकुचित होते, पाण्याचा प्रवाह आकुंचन पावतो. दोन भिंतींच्या जागेत नदीची सीमा ठरवली जाते. त्यांची साठवण क्षमता ओलांडली, की नदीला पूर येतो. पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. नदीपात्रात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करणे, त्यावर बांध घालणे शास्त्रीय आणि भूवैज्ञानिक दृष्टिकोनातून पूर्णपणे चुकीचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आलेला वेगवेगळा पाऊस, शेकडो वर्षांचे झरे त्यामुळे नदीचा नैसर्गिक काठ तयार होतो. दर वर्षी पूररेषा ठरवताना मागच्या काही दशकांचा विदा महत्त्वाचा ठरतो. मात्र, आपल्याकडे अलीकडच्या काही काळात विदा साठवण्याची सुरुवात झाली आहे. पूररेषा, नियंत्रण रेषा यांचा विचार निदान पुण्यासारख्या सखल भागात केला पाहिजे. पाऊस फारच मोठ्या प्रमाणात नेहमीच पडतो असे नाही. एखाद्या वर्षी पाऊस अधिक झाला, तर निसर्गात तो सहन करण्याची सक्षम असते. नदीला नदीची जागा सोडणे हाच पूर प्रश्नावर उपाय आहे.

नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न अलीकडच्या काळात भेडसावतो आहे. त्यावर कोणते मार्ग शोधायला हवेत?

– नदीच्या पात्रामध्ये कोणत्याही प्रकारची घाण सोडणे, विनाप्रक्रिया सांडपाणी सोडणे अत्यंत धोकादायक आहे. मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणारे मल-मूत्र नदीच्या पाण्यातील जिवाणू, जीवजंतू आणि मासे खात असतात. स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नदीची स्वत:ला स्वच्छ करण्याची क्षमता असते. नदीच्या या गाळण क्षमतेपलीकडे पात्रामध्ये घाण टाकली जाते, तेव्हा खरे प्रश्न निर्माण होतात. नदीला स्वच्छ व्हायला अवकाश मिळत नाही. कुठल्याही धरणानंतर, बंधाऱ्यानंतर नदी कोरडी पडते. त्यामुळे त्यात सोडलेले सांडपाणी नदीच्या पाण्यात मिसळत नाही. ते तसेच राहते. पुन्हा पाऊस झाल्यानंतर, नदीपात्रात पाणी वाढल्यानंतर हे सांडपाणी पुढे जाते. पुढच्या बंधाऱ्यावर अडकून बसते. ही प्रक्रिया वारंवार तशीच सुरू राहिल्याने सांडपाण्याचा प्रश्न तसाच राहतो. त्यामुळे घाण न सोडणे किंवा प्रक्रिया करूनच सांडपाणी सोडणे महत्त्वाचे आहे. डोळ्यांना दिसणारे मल-मूत्र बाजूला काढण्याचा अट्टाहास केला जातो. मात्र, पाण्यात विरघळणारी रसायने सगळ्यांकडूनच दुर्लक्षित केली जातात. त्या रसायनांमुळे काठावरच्या वस्त्यांमध्ये पर्यायाने शहरांमध्येही अनेक दुर्धर आजार निर्माण होतात. व्यवस्थेने मूळ रसायने नदीमध्ये येणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी व्हायला हवी. नागरिकांनी अंघोळीचा साबण, टूथपेस्ट अशा प्रकारच्या न विरघळणाऱ्या रसायनांचा वापर कमी करायला हवा. निसर्गाच्या जैवसाखळीमध्ये सहजपणे विघटित होणाऱ्या संसाधनांचा वापर करणे गरजेचे आहे. सांडपाण्याच्या प्रश्नावर सर्वांगाने विचार करून उपाययोजना केल्यास नदी आणि मानवी वस्त्याही निरोगी राहू शकतात.

भूजल पातळी खालावल्याने निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कशा प्रकारे सोडवायला हवा?

– नदीचे, पावसाचे पाणी कोट्यवधी वर्षे खडकातून झिरपत जाते. आणखी खाली जायला जागा मिळाली नाही, की ते त्याच ठिकाणी साचते. हे साचलेले भूजल आपल्या गरजेसाठी शेकडो वर्षांपासून उपसले जाते आहे. पूर्वी वापर कमी होता, त्यामुळे विहिरीला पाणी होते. मात्र, आता नदीच कोरडी पडल्याने भूजल पुनर्भरण होत नाही. प्रत्येक गावात हजारो विहिरी झाल्या आहेत. लाखो विंधन विहिरींमधून पाणी उपसले जाते. भूजलाचे पुनर्भरण मात्र होत नाही. या समस्येवर एकच उपाय आहे तो म्हणजे, आपण पाण्याचा वापर आटोक्यात आणायला हवा. तलाव, धरणे अशा माध्यमातून साठवलेले पावसाचे पाणी वापरायला हवे. भूजलावरचा ताण कमी करून साठवलेल्या पाण्याचा वापर वाढायला हवा.