गेल्या काही वर्षांत अवकाशविज्ञान, खगोलशास्त्र अशा विषयांना लोकप्रियता प्राप्त झाली आहे. त्यातील नवनव्या संशोधनांविषयी कुतूहल वाढू लागले आहे. आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका), राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (एनसीआरए) अशा संशोधन संस्थांमुळे पुण्याचे नाव खगोलशास्त्राशी संबंधित संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले आहे. मात्र, या संस्थांच्या स्थापनेच्याही आधी, स्वातंत्र्यपूर्व काळातच स्थापन झालेली ‘ज्योतिर्विद्या परिसंस्था’ ही संस्था खगोलशास्त्राच्या प्रचार-प्रसारासाठी दीर्घ काळ कार्यरत आहे. खगोलशास्त्रासारख्या विशिष्ट विषयाला वाहिलेल्या या संस्थेच्या स्थापनेला ३१ मे रोजी एक हजार महिने पूर्ण झाले. त्या निमित्ताने ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा सहस्रचंद्रदर्शन सोहळाही आयोजित करण्यात आला.

न. चिं. केळकर, प्रा. डी. डी. कपाडिया, के. आर. कानिटकर, ज. स. करंदीकर, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, जे. आर. घारपुरे, रँग्लर जी. एस. महाजनी, प्रा. जी. एल. चंद्रात्रेय, प्रा. एम. एल. चंद्रात्रेय, प्री. टी. जी. ढवळे, प्रा. सखारामपंत आपटे अशा मान्यवरांनी एकत्र येऊन २२ ऑगस्ट १९४४ रोजी (गणेश चतुर्थी) ज्योतिर्विद्या परिसंस्था या संस्थेची पुण्यात स्थापना केली. हौशी खगोलप्रेमींनी स्थापन केलेली ही केवळ भारतातीलच नाही, तर आशियातील पहिली संस्था ठरली. खगोलशास्त्राविषयी जागृती निर्माण करणे, खगोलशास्त्राविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, हा या संस्थेचा मुख्य उद्देश. त्या अनुषंगाने आकाश निरीक्षणे, व्याख्यानमाला, अवकाशीय नकाशांचे प्रकाशन, पंचांग कृती वर्ग, खगोलशास्त्रीय प्रदर्शन असे उपक्रम १९४५ पासून सुरू झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात खगोलशास्त्रासारख्या वैज्ञानिक क्षेत्रातील मूलभूत स्वरूपाचे काम करण्याच्या उद्देशाने हौशी पातळीवर स्थापना होऊन आजही कार्यरत असलेली ज्योतिर्विद्या परिसंस्था हे आगळेवेगळे उदाहरण ठरली आहे. विशेष म्हणजे, आजही जुन्या-नव्या पिढीचे खगोलप्रेमी सक्रियपणे कार्यरत आहेत. संस्थेचे उपक्रम उत्साहाने, कल्पकतेने आयोजित केले जातात. त्यात विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ खगोलप्रेमींपर्यंत सर्वांना संस्थेच्या उपक्रमांमध्ये सामावून घेतले जाते.

ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे कार्यकारी सदस्य अथर्व पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्थेची अनोखी टेलिस्कोप लायब्ररी आहे. त्यातील दुर्बिणी सदस्यांना घरी वापरण्यासाठीही दिल्या जातात. ही अशा प्रकारची देशातील एकमेव लायब्ररी आहे. तसेच केसरीवाडा येथे संस्थेची वेधशाळाही आहे. दर महिन्याला रात्रभर आकाशदर्शन कार्यक्रम, शालेय विद्यार्थी, खगोलप्रेमींच्या विज्ञान सहली आयोजित केल्या जातात. आठवीच्या पुढील विद्यार्थी, खगोलप्रेमींसाठी महिनाभराचा प्राथमिक खगोलशास्त्र वर्ग, तर चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या सुटीत खगोलशास्त्राची तोंडओळख करून देणारा वर्ग आयोजित केला जातो. त्याशिवाय दर वर्षी खगोलविषयक प्रदर्शनही आयोजित केले जाते. सूर्यग्रहण, चंद्रहण, पिधान अशा खगोलशास्त्रीय घटनांविषयी माहिती देणे, जनजागृती करणे, अंधश्रद्धा दूर करणे असे उपक्रमही राबवण्यात येतात. बदलत्या काळानुरूप संस्थेच्या कामकाजात आता कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या (एआय) तंत्रज्ञानाचाही अवलंब करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची नवी पिढी तंत्रज्ञानाला सरावलेली असल्याने प्राथमिक स्वरूपात संस्थेच्या सुविधांचा वापर, उपक्रमांमध्ये तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे.

विविध प्रकारच्या संस्था असलेल्या पुण्यात ज्योतिर्विद्या परिसंस्था ही संस्था निश्चितच महत्त्वाची आहे. गेल्या अनेक वर्षांत संस्थेशी जोडले गेलेले अनेक विद्यार्थी आता खगोलशास्त्र संशोधनातही कार्यरत आहेत. म्हणूनच खगोलशास्त्राविषयी जनजागृती करतानाच खगोलशास्त्राविषयी मार्गदर्शन करणाऱ्या, खगोलशास्त्राविषयी आकर्षण निर्माण करणाऱ्या ज्योतिर्विद्या परिसंस्था या संस्थेचे सहस्रचंद्रदर्शन ही महत्त्वाची घटना ठरते.

chinmay.patankar@expressindia.com