पुणे : राज्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यात होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना ९ ऑक्टोबर अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमांच्या अनुमानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी या वर्गांवर शिक्षण सेवक, शिक्षक या पदावर नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ही परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित करण्यात येते. त्यानुसार २३ नोव्हेंबर रोजी ही परीक्षा घेण्याचे नियोजित आहे. संबंधित अधिक माहिती https://mahatet.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. टीईटी परीक्षेचा पेपर एक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी एक या वेळेत, तर पेपर दोन दुपारी २.३० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.

परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना परीक्षा अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी १५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. तसेच १० ते २३ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, पूर परिस्थिती निर्माण झाल्याने उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यास अडचणी आल्या. त्यामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आता उमेदवारांना ९ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज आणि परीक्षा शुल्क भरता येणार आहे. यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.