पुणे : घाऊक बाजारात परराज्यातून मटारची आवक कमी होत असल्याने मटाराच्या दरात वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात घट झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेशातून मिळून १५ ते २० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून मिळून ४ ते ५ टेम्पो शेवगा, हिमाचल प्रदेशातून ३ टेम्पो मटार, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातून मिळून ३ ते ४ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात आणि मध्य प्रदेशातून ८ ते १० टेम्पो लसूण, इंदूर येथून ५ ते ६ टेम्पो गाजर अशी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ५५० ते ६०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ५ ते ६ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर १४ ते १५ टेम्पो, भुईमूग शेंग १०० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ७० ते ७५ ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ४० ते ४२ ट्रक बटाट्याची आवक झाली

पुदिना, अंबाडी, चुका, चवळईच्या दरात वाढ

मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. पुदिना, अंबाडी, चुका, चवळईच्या दरात वाढ झाली असून, कोथिंबीर, शेपू, पालकाच्या दरात अल्पशी घट झाली आहे. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरेच्या ९० हजार जुडींची, तसेच मेथीच्या २० हजार जुडींची आवक झाली. पालेेभाज्यांचे शेकड्यातील दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर – १००० ते २५००, मेथी – २००० ते ३५००, शेपू – ८०० ते १५००, कांदापात – १५०० ते २०००, चाकवत – ५०० ते ८००, करडई -४०० ते ६००, पुदिना – ५०० ते १०००, अंबाडी – ५०० ते ८००, मुळे – १२०० ते १५००, राजगिरा – ४०० ते ७००, चुका – ५०० ते १०००, चवळई – ५०० ते ८००, पालक -१५०० ते २०००

लिंबे स्वस्त

पावसामुळे लिंबांना मागणी कमी असून, लिंबांच्या दरात घट झाली आहे. कलिंगड, खरबूजच्या लागवडीवर परिणाम झाला असून, दरात वाढ झाली आहे. चिकूच्या दरात दहा किलोमागे २०० रुपयांनी वाढ झाली आहे. लिंबांच्या १५ किलो गोणीमागे १०० रुपयांनी घट झाली आहे. अन्य फळांचे दर स्थिर असल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक फळबाजारात मोसंबी २५ ते ३० टन, संत्री १ टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड ४ ते ५ टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, चिकू ३०० खोकी, पेरू ४०० ते ५०० प्लास्टिक जाळी (क्रेट्स), सीताफळ ४० ते ५० प्लास्टिक जाळी, तसेच केरळहून ४ ट्रक अननस अशी आवक झाली.