राज्यभरात आमच्या संघटनेच्या २० नेत्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या आदेशानेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आमच्यावर ही कारवाई केली आहे. आमचा विनाकारण छळ सुरू आहे. आमच्या नेत्यांना चार-पाच वर्षे तुरुंगात टाकून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करीत आहेत. आम्हाला या देशाचे नागरिक म्हणून सन्मानाची वागणूक मिळत नाही, अशी टीका पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (पीएफआय) पुणे जिल्हाध्यक्ष मोहम्मद खैस शेख यांनी केली आहे. या वेळी कुल जमाती तंजीमचे समन्वयक इलियास मोमीन आणि सावित्री फातिमा विचार मंचचे अली इनामदार यांनी आपले मत मांडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेख म्हणाले, की पुण्यातील दोघांसह राज्यातून एकूण २० जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. कोणतेही चुकीचे कृत्य केले नसताना आमच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केले जाते. त्यांना चार-पाच वर्षे तुरुंगात टाकून आयुष्य उद्ध्वस्त केले जाते. आमच्या संघटनेची स्थापना २००७ मध्ये झाली. २०१४ पर्यंत आमच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. २०१४ला भाजपची सत्ता आल्यापासून विनाकारण लक्ष्य केले जात आहे. करोना काळात आमच्यावर परदेशांतील देणग्यांवरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला. आमची सर्व कागदपत्रे तयार होती, त्यामुळे ईडीला पुढे कारवाई करता आली नाही. आता एनआयए आमच्या संघटनेच्या कार्यालयांवर धाडी टाकत आहे. आम्ही याचा निषेध करतो. आम्हाला दहशतवाद्यांसारखी वागणूक मिळत आहे. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्हाला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे.

कोंडव्यात पीएफआयचे कार्यालय नाही
कोंढव्यात ज्या ठिकाणी एनआयएने छापा टाकला, ते पीएफआयचे कार्यालय नाही. संस्थेकडून कार्यक्रमावेळी ठराविक वेळेसाठी हॉल भाड्याने घेतला जातो. त्या हॉल मालकालाही एनआयएने दमदाटी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी केसरबाग परिसरात कार्यालय सुरू केले आहे, असेही शेख म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popular front of india says bjp rss ask to target us pune print news scsg