पुणे : राज्यातील वातावरणाची स्थिती पाहता नोव्हेंबरअखेपर्यंत यंदाही हवामानाचे हेलकावे अनुभवण्यास मिळणार आहेत. नोव्हेंबरच्या सुरुवातीस असलेली थंडी आता कमी होऊ लागली असून, अनेक भागांत अंशत: ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यातच चार ते पाच दिवसांत दक्षिण कोकणात तुरळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या महिन्यात पुढील काळात वातावरणाच्या स्थितीत सातत्याने बदल होणार असल्याने ऊन, थंडी आणि पाऊस आदी तीनही ऋतूंची अनुभूती मिळण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवडय़ात किमान तापमानात झपाटय़ाने घट होऊन गारवा निर्माण झाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाही राज्याच्या बहुतांश भागांतील तापमानात घट होऊन थंडी अवतरली. या काळामध्ये राज्यात आकाशाची स्थिती निरभ्र आणि कोरडय़ा हवामानाची निर्माण झाल्याने प्रामुख्याने किनारट्टीच्या भागात कोकण विभागामध्ये आणि विदर्भात काही भागांत दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढला. याच कालावधीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात तापमानाचा पारा घसरला होता. औरंगाबाद, पुणे, नगर, नाशिक, जळगाव आदी भागांत नीचांकी तापमानाची नोंद झाली.

बुधवारपासून राज्यातील वातावरणात पुन्हा बदल सुरू झाला आहे. राज्याच्या बहुतांश भागात आता अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दिवसाचे तापमान सरासरीच्या जवळपास आले आहे. काही भागांत रात्रीही अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. गेल्या आठवडय़ात १२ ते १४ अंश सेल्सिअसवर असलेले मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ातील तापमान आता १४ ते १७ अंशांवर गेले आहे. बुधवारी जळगाव येथे राज्यातील नीचांकी १४.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे ३५.२ अंश नोंदविले गेले. पुढील चार ते पाच दिवसांत दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र या कालावधीत कुठेही पाऊस होणार नाही.

तापमानातील बदल कशामुळे?

ऑक्टोबरच्या शेवटी पावसाळी वातावरण दूर होऊन निरभ्र आकाश झाल्याने गारवा निर्माण झाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीला कोरडय़ा स्थितीमुळे सर्वत्र थंडी अवतरली. यंदा र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांना परतण्यास उशीर झाला आणि ईशान्य मोसमी वारे दक्षिणेकडे सक्रिय होण्यासही विलंब झाला. सध्या दक्षिणेकडे हे वारे सक्रिय आहेत. त्यामुळे दक्षिणेकडील तमिळनाडू, केरळ आणि परिसरात पाऊस होत आहेत. उत्तरेकडेही चक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. परिणामी राज्यात अंशत: ढगाळ स्थिती आहे. त्यामुळे थंडी कमी होत आहे. याच स्थितीतून दक्षिण कोकणात तुरळक भागांत पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Possibility experiencing all three seasons throughout the month bad weather in november ysh