पुणे : बाणेर भागातील एका सोसायटीच्या आवारातील झाडाच्या फांद्या तोडताना तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. मजुराला सुरक्षाविषयक साधने न पुरविता दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदारासह सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
लहू गुलाब क्षीरसागर (वय ६६, रा. इंगवले चौक, पिंपळे निलख) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. याबाबत क्षीरसागर यांचा मुलगा अमोल (वय ३४) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ठेकेदारासह सोसायटीतील अध्यक्ष, तसेच चिटणीस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर भागातील ऋतुरंग पार्क परिसरात सोसायटी आहे. या सोसायटीच्या आवारात झाडाच्या फांद्या वाढल्या होत्या. फांद्या तोडण्याचे काम सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडे दिले होते. २७ जुलै रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास लहू क्षीरसागर हे झाडावर चढले. फांद्या कापत असताना त्यांचा तोल जाऊन कोसळले. क्षीरसागर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ठेकेदार, तसेच सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी झाडाच्या फांद्या तोडताना पुरेशी सुरक्षाविषयक साधने पुरविली नाहीत. बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडली, असे अमोल क्षीरसागर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक थिटे तपास करत आहेत.
शहरातील सोसायटीच्या आवारातील झाडांच्या फांद्या कापण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. उद्यान विभागाने परवानगी दिल्यानंतर झाडांच्या फांद्या तोडण्यात येतात. महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकारी, कर्मचारी बऱ्याचदा ओळखील ठेकेदारांना फांद्या तोडण्याचे काम देतात. त्यासाठी ठेकेदार संबंधित सोसायटीकडून पैसे घेतात. झाड तोडल्यानंतर फांद्यासह लाकूड फाटा ठेकेदार जमा करताे. हा लाकूडफाटा ठेकेदार विक्री करतो, तसेच सोसायटीकडून झाड तोडण्यासाठी पैसेही घेतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. रस्त्यावरील झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम महापालिकेच्या उद्यान विभागाकडून केले जाते.
जून महिन्यात कर्वेनगर भागात झाडाची फांदी कोसळून एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पेशवे उद्यान परिसरात झाडाची फांदी रिक्षावर कोसळून एका प्रवासी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला होता. धोकादायक झाडांच्या फांद्यामुळे यंदा पावसाळ्यात दोन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर उद्यान विभागाने शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्या कापण्यास सुरुवात केली.