ब्राह्मण महासंघाच्यावतीने आज पुण्यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलतान विक्रम गोखले यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शिवसेना व भाजपा युतीबाबतही आपलं मत व्यक्त केलं. तसेच, यावेळी त्यांनी शिवसेना व भाजपाला एकत्र येण्याचा सल्ला देत सूचक इशारा देखील दिल्याचं दिसून आलं. “त्यांच्या दोघांत जे काही झालं असेल ते त्यांनी जनतेला विश्वासात घेतलं पाहिजे, लोकांना फसवू नका तुम्ही. लोक केव्हा तरी मग प्रचंड शिक्षा करतात आणि ती आता आपण भोगत आहोत”असं यावेळी विक्रम गोखलेंनी बोलून दाखवलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विक्रम गोखले म्हणाले, “ज्या कारणासाठी बाळासाहेबांनी आपला देह ठेवला. बाळासाहेबांनी ज्यासाठी आपली शिवसेना स्थापन केली. ज्या मराठी माणसाला एक आधार वाटला. त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील? याची कल्पना फक्त जे आता बाहेर राहून केवळ बघत आहेत, त्यांनाच येऊ शकते. त्यातला मी एक आहे. माझी सख्खी आत्येसासू ही बाळासाहेबांच्या महिला आघाडीची पहिली शिवसेना प्रमुख होती. बाळासाहेब माझे स्वतःचे मामे सासरे. तेव्हा बाळासाहेबांची भाषण ऐकूण महाराष्ट्र ४० वर्षे तृप्त झालेला आहे. त्यांच्या निधनानंतर राजकारणातील जे खेळ सुरू आहेत. ते इतक्या विचित्र स्तरावर पोहचलेले आहेत, की त्यामध्ये मराठी माणूस असो किंवा आता महाराष्ट्रपुरते बोलायचे तर महाराष्ट्रातील माणूस हा भरडला जातोय. लोक अस्वस्थ आहेत, तुम्हाला कल्पना नाही. प्रसारमाध्यमांना फारशी कल्पना नसते. आमच्या सारखी माणसं फिरत असतात, सर्व क्षेत्रातील लोकांचा आमचा संपर्क येतो. त्या प्रत्येकाचं हे म्हणणं आहे की हे सगळं गणित चुकलेलं आहे. परंतु हे गणित सुधारायचं असेल तर अजुनही वेळ गेलेली नाही. ज्या संकटाच्या कड्यावरती आता आपला देश उभा आहे, त्यातून त्याला मागे खेचायचं असेल तर भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र आलंचं पाहिजे, अशी माझी श्रद्धा आहे. माझे प्रयत्न सुरू आहेत. ”

स्वातंत्र्याची भीक मिळाल्याच्या कंगनाच्या वक्तव्याचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंकडून समर्थन; म्हणाले…

“ फडणवीसांना मी प्रत्यक्ष प्रश्न विचारलेला होता की, तुमचं त्याने काय बिघडलं असतं? जर अडीच वर्षे त्यांना दिली असती. तुम्हाल कुठली हवी होती पहिली की नंतरची अडच वर्षे? हे माझे त्यांना प्रश्न आहेत. मी तोंड दाभणाने बांधून घेत नाही आणि म्हणून मी कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही. कारण, मी फाडफाड बोलणार माणूस आहे. मी वरचे आदेश वैगरे सगळं झुगारून देतो. त्यांच्या दोघांत जे काही झालं असेल ते त्यांनी जनतेला विश्वासात घेतलं पाहिजे, लोकांना फसवून नका तुम्ही. लोक केव्हा तरी मग प्रचंड शिक्षा करतात आणि ती आता आपण भोगत आहोत.”

एसटीला, एअर इंडियाला गाळात घालण्याचं काम राजकीय लोकांनी केलेलं आहे –

तसेच, एसटी कामगारांच्या आंदोलनाबाबत बोलातना विक्रम गोखले यांनी सांगितलं की, “एसटी महामंडाळाचा मी एकेकाळी ब्रॅण्ड अम्बेसेडर होतो. माझा एसटीच्या एकूण अर्थशास्त्रावर जो लेख आला होता, त्यावर विद्वान लोकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या की एवढा अभ्यास एसटी महामंडळातील कुठल्याही सर्वोच्च अधिकाऱ्याने देखील केलेला नाही. एसटीला गाळात घालण्याचं काम, एअर इंडियाला गाळात घालण्याचं काम हे राजकीय लोकांनी केलेलं आहे. एअर इंडिया जगातील एकमेव एअरलाईन होती जी ६० हजार कोटींच्या फायद्यात होती जी आता ४० हजार कोटींच्या तोट्यात आहे. याचं कारण फक्त राजकीय लोक आहेत. एसटीचा संप मिटला पाहिजे, एसटी दारोदारी जाणारी आहे. ती काय खासगी ट्रव्हल्स नाही. एसटी रस्त्यात बंद पडली की दुसरी एसटी ताबडतोब मागवून घेतात त्यांच्याकडे १८ हजार बसेस आहेत. कुणाकडे एवढी ताकद आहे? जगामध्ये एसटी एक नंबर आहे. एवढं मोठं जाळं विणलं आहे एसटीने आणि त्याची वाट लावली.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena bjp should come together vikram gokhale msr