पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कंपनीच्या सुरक्षा तपासणी प्रक्रियेला विलंब झाल्याचा फटका पुण्यातील सहा राष्ट्रीय नेमबाजांना बसला. नेमबाजांकडे काडतूस आणि उपकरणे असल्याने काटेकोर तपासणी करण्यात वेळ गेल्याचे संबंधित विमान कंपनीने सांगितले. दरम्यान, पाच नेमबाजांना आज, बुधवारी (१७ सप्टेंबर) पहाटे अन्य कंपनीच्या विमानाने गोव्यात रवाना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नेमबाजांच्या प्रशिक्षक नुपूर हगवणे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गोव्यात आयोजित १८ वर्षाखालील १२ व्या पश्चिम विभागीय नेमबाजी स्पर्धेला आज, बुधवारपासून (१७ सप्टेंबर) सुरुवात होणार आहे. नेमबाजांनी पुणे विमानतळावरून मंगळवारी ‘अकासा’ या खासगी विमान कंपनीच्या पुणे ते गोवा विमानाचे आरक्षण केले होते. विमान संध्याकाळी ५:२५ वाजता निघणार होते आणि रायफल आणि पिस्तूल तपासणीसाठी पुरेसा वेळ देण्यासाठी आम्ही २ वाजताच विमानतळावर पोहोचलो. शस्त्रे वाहून नेली जात असल्याने अनेक कागदपत्रे तपासायची आहेत. तथापि, एअरलाइनच्या अननुभवी कर्मचाऱ्यांनी सुरक्षा तपासणीसाठी इतका वेळ घेतला की, संथ गतीने तपासणी करण्याच्या नादात तिकडे विमानाचे उड्डाण झाले होते.’
विमानाचे उड्डाण चुकेल असे सांगितले जात असताना, कंपनीच्या सुरक्षारक्षकांकडून दिरंगाई केल्याचा आरोप रुद्र क्षीरसागर या खेळाडून केला. तसेच एरव्ही इतर ठिकाणी स्पर्धेसाठी जाताना पिस्तूल, रायफलची तपासणी दहा ते पंधरा मिनिटात होत असताना, या कंपनीच्या सुरक्षारक्षकांना एका नेमबाजाची तपासणी करण्यासाठी अर्धा ते पाऊणतास लावला गेला असल्याचेही इतर नेमबाजांनी सांगितले.
अकासाची दिलगीरी
‘नेमबाजांच्या प्रवासी सामानात असलेली पिस्तूल, रायफल आणि इतर उपकरणांमुळे सुरक्षा तपासणी प्रक्रियेत विलंब झाला. त्यामुळे विमान चुकले आणि गैरसोय झाली. आमचे स्थानिक पातळीवरील कर्मचारी आवश्यक ती मदत करून पर्यायी प्रवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे नेमबाज त्यांच्या स्पर्धेपूर्वी वेळेत पोहचण्यासाठी नियोजन करत आहोत,’ असे ‘अकासा’ कंपनीतर्फे सांगण्यात आले.
या पाच नेमबाजांना फटका
नेमबाज अनुश्री कालुथे, श्रीषा पाटील, रुद्र क्षीरसागर, अदिती धाबडे आणि राजवर्धन हगावणे आणि मनवा कदम हे सहा नेमबाज या स्पर्धेला जाणार होते. तपासणी प्रक्रियेत विलंब लागल्याने यापैकी केवळ मनवा हीच एकटी त्या पुणे गोवा या विमानाने जाऊ शकली. मात्र, तिची राय़फल विमानतळावरच राहिली. उर्वरीत पाच खेळाडू आणि प्रशिक्षक त्याच ठिकाणी अडकून पडले. पहाटे उशिरापर्य़ंत या खेळाडूंना विमानतळावर प्रतिक्षेत थांबावे लागले. नेमबाजांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.