पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी येत्या १७ ते ३१ मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने प्रसिद्ध केल्या आहेत. अर्ज करताना पालकांना दहा शाळांची निवड करावी लागणार असून, एकापेक्षा जास्त अर्ज भरल्याचे आढळल्यास अर्ज सोडतीसाठी विचारात घेतला जाणार नाही. तसेच अर्जात चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास प्रवेश रद्द केला जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्ध केल्या. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आर्थिक दुर्बल, वंचित, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकांतील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित) आणि महानगरपालिका शाळांमध्ये (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) पहिली किंवा पूर्वप्राथमिक या स्तरावर २५ टक्के राखावी जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. आरटीई प्रवेशासाठी या पूर्वी ऑनलाइन अर्ज केलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार आहे. आधीच्या अर्जाचा २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा – पुणे : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने केला आईचा खून

हेही वाचा – बालभारती-पौड रस्त्यावरून खासदार मेधा कुलकर्णी आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात वादाची ठिणगी?

आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असलेल्या पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी विचारपूर्वक १० शाळांची निवड करावी. शाळेपासून घरापर्यंतचे हवाई अंतर गुगल मॅपने निश्चित करायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थनाचे ठिकाण निश्चित करण्यासाठी तो बलून जास्तीत जास्त पाच वेळाच निश्चित करता येईल. त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे स्थान अचूक नमूद करावे. अर्ज भरण्याच्या कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा. प्रवेश प्रक्रियेबाबत काही समस्या असल्यास आरटीई संकेतस्थळावर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. मदत केंद्राशी संपर्क साधून समस्येचे निराकरण करावे. आरटीई २५ टक्के अंतर्गत या पूर्वी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले. अधिक माहिती https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then admission under rte will be cancelled guidelines published by education department pune print news ccp 14 ssb