पुणे : पुणे-सातारा महामार्गावर वरवे गावाजवळ झालेल्या विचित्र अपघातात शिवशाही बसमधील नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. अपघातात खासगी बसचालकाचा मृत्यू झाला. अपघातात एकूण नऊ जण जखमी झाले. पुणे- सातारा महामार्गावर वरवे गावाजवळ हॉटेल सह्याद्री समोर म्हैसुरकडून मुंबईकडे खासगी आराम बस निघाली होती. त्या वेळी पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने आराम बसला धडक दिल्यामुळे बस महामार्गावर उलटली. कंटेनरचालकाचा ताबा सुटल्याने तो पुण्याकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसवर आदळला.
हेही वाचा >>> आरपीएफमुळे प्रवाशांना जीवदान!
या अपघातात शिवशाही बसमधील प्रवासी ऋतुजा रवींद्र चव्हाण (वय ९, रा. लक्ष्मी ग्रीन काऊंटी, एनडीए गेटजवळ, उत्तमनगर, पुणे), खासगी आराम बसचालक शिवराजकुमार आर. रंगास्वामी गौडा (वय ३४, रा. होसाहनी, हसन, कर्नाटक) यांचा मृत्यू झाला. आराम बसमधील प्रवासी रवींद्र रामा पुजारी, रत्ना रवींद्र पुजारी, वीणा प्रभाकर गौडा, हेमा अण्णा गौडा, संजू रवी गौडा, मिनाश्री गौडा, पार्वतम्मा देवगौडा, ज्योती यजरान गौडा, तसेच शिवशाही बसमधील प्रवासी सुनंदा रवींद्र चव्हाण (वय ४२) जखमी झाले आहेत. जखमींवर नसरापूर, खेड शिवापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजगड पोलिसांनी या प्रकरणी कंटेनरचालक गोरख लक्ष्मण शिंदे (रा. कळंबोली, नवी मुंबई) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.