पिंपरी : तीर्थक्षेत्र देहू, आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी चिखलीत ४० आणि २० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. अमृत २.० अभियानांतर्गत हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्याला राज्य सरकारच्या तांत्रिक समितीने मान्यता दिली. त्यामुळे प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे नदीचे प्रदूषण कमी होणार आहे.
मावळ तालुक्यातील कुरवंडे गावातून इंद्रायणी नदी उगम पावते. पुढे ती तीर्थक्षेत्र देहूगाव, आळंदीमार्गे तुळापूर येथे भीमा नदीला मिळते. भीमा नदी पुढे मुळा-मुठा नदीला घेऊन उजनी धरणमार्गे पंढरपूरला जाते. पिंपरी-चिंचवड शहरात १८.८० किलोमीटर अंतर नदीचे पात्र आहे. नदी शहरात येताच अनेक गटारी, नाले नदीत थेट मिसळतात. त्यामुळे नदीतील पाण्याचा रंग बदलू लागतो. निर्मळ पाण्याला नाल्याचे रूप येते. इंद्रायणीत जलपर्णी दिसते. कुदळवाडी नाल्यातून औद्योगिक कंपन्यामधील रसायनमिश्रित पाणी नदीत मिसळते.
प्रदूषित झाल्याने नदीला तवंग येतो. नदीच्या प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे महापालिकेने चिखलीत दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे निर्णय घेतला होता. अमृत २.० अभियानांतर्गत हे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविला होता. त्याला राज्य शासनाच्या तांत्रिक समितीने मान्यता दिली. चिखलीतील रिव्हर रेसिडन्सी आणि स्मशानभूमीजवळ हे ४० आणि २० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यासाठी ५२६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यांपैकी ५० टक्के म्हणजे २६३ कोटी रुपयांचा निधी राज्य शासन देणार आहे.
नदीकाठांचे सक्षमीकरण
या प्रकल्पातून नदीसंवर्धन, पूरनियंत्रण, पाण्यावर प्रक्रिया आणि सौंदर्यीकरण अशा चारही बाबी साध्य केल्या जाणार आहेत. पावसाचे पाणी साठवण्यासाठी जलनि:सारण प्रणाली, प्रदूषित पाणी सांडपाणी प्रकल्पाकडे वळविण्यासाठी ‘इंटरसेप्टर’, पूर नियंत्रणासाठी दगडी बांधकाम, नदीच्या काठांचे सक्षमीकरण, नदीपात्राचे तटबंदीकरण, नदी तटावर हरित क्षेत्राचा विकास, वनसंवर्धनाद्वारे सुशोभीकरण अशी कामे एकत्रितपणे करण्यात येणार आहेत. यामुळे नदी प्रदूषण रोखता येणार असून, नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे पर्यावरण विभागाने सांगितले.
इंद्रायणी नदीकाठी चिखलीत दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास राज्य सरकारच्या तांत्रिक समितीची मान्यता मिळाली आहे. त्यासाठी राज्य सरकार ५० टक्के निधी देणार आहे. लवकरच प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येईल. या प्रकल्पात पाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडले जाईल. त्यामुळे नदी प्रदूषणात घट होईल, असा दावा महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी केला.
पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील सुमारे ५० लाख नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या आणि महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी स्वच्छ केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे नदीचे प्रदूषण कमी होणार आहे. प्रशासनाने तातडीने प्रकल्प उभारण्याचे काम हाती घ्यावे, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली.