पुणे : यंदा सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे १०० टक्के भरली नाहीत. त्यामुळे सध्या पाणीसाठा ८९ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी २० नोव्हेंबरला चारही धरणांत मिळून ९५ टक्के पाणीसाठा होता. यंदा शहराला दोन महिने पुरेल एवढ्या पाण्याची तूट असल्याचे निरीक्षण जलसंपदा विभागाने नोंदविले आहे. सध्या शहरात कोणत्याही प्रकारची पाणीकपात नसली, तरी नव्या वर्षात पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहराला खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो, तर शहराच्या पूर्व भागाला काही प्रमाणात भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणांमध्ये यंदा कमी पाऊस झाल्याने कमी पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला प्रकल्पातून नवीन मुठा उजवा कालव्यातून रब्बीचे सिंचन आवर्तन २५ नोव्हेंबरपासून सोडण्यात येणार आहे. शहरासाठी दरमहा सव्वा ते दीड टीएमसी पाणी महापालिका धरणातून उचलते. मात्र, यंदा दरमहा एक टीएमसी पाणीच महापालिकेला घ्यावे लागणार आहे. हे पाहता सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये एक ते दोन महिने पाणी पुरेल, एवढ्या पाण्याची तूट असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – जलमापक बसविण्यास विरोध केल्यास पोलीस कारवाई; पुणे महापालिकेचा निर्णय

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतही जलसंपदा विभागाने महापालिकेला पाणी जपून वापरण्याबाबत सांगितले आहे. तसेच शहराला पिण्यासाठी जेवढे पाणी आवश्यक आहे, तेवढे धरणात राखून ठेवण्यात येणार आहे. उर्वरित पाणी शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. मात्र, काटकसरीने पाणी वापरण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिकेला याच बैठकीत गेल्या महिन्यात दिल्या आहेत.
दरम्यान, महापालिकेत समाविष्ट झालेली गावे, वाढती लोकसंख्या आणि स्थलांतराचे वाढते प्रमाण विचारात घेऊन पुणे शहराला २० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी कोटा मंजूर करावा, अशी मागणी महापालिकेकडून करण्यात आली आहे. मात्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या निकषानुसार १२.८६ टीएमसी कोटा पुण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे वाढीव कोटा मंजूर करता येणार नाही, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच जुलै २०२४ पर्यंत पुणे शहराला पाणी पुरेल, यासाठी १५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी धरणात राखीव ठेवण्यात येणार आहे. याशिवाय नव्या वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना शहर आणि ग्रामीण भागात पाणीकपात करणे परवडणारे नाही. या पार्श्वभूमीवर धरणांमधील उपलब्ध पाण्याचे समन्यायी वाटप करणे आणखी जिकिरीचे होणार आहे.

हेही वाचा – जलमापक बसविण्यास विरोध केल्यास पोलीस कारवाई; पुणे महापालिकेचा निर्णय

पाणीसाठा झपाट्याने संपण्याची शक्यता

सध्या चारही धरणांत मिळून एकूण २५.९६ टीएमसी (८९.०५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी २० नोव्हेंबरपर्यंत धरणांमध्ये २७.८२ (९५.४१ टक्के) पाणीसाठा होता. उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याची मागणी वाढणार आहे. तसेच धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन, पाणीचोरी, पाणीगळती, याशिवाय ग्रामीण भागाचे सिंचन आवर्तन आणि यंदा पाणीसाठा कमी असल्याने चालू वर्षी सुरू झालेले पाण्याचे टँकर बंदच झालेले नाहीत. त्यामुळे टँकरची संख्या वाढणार आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा संपण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water cut in pune in the new year find out why pune print news psg 17 ssb