प्रा. गिरीश टिल्लू (विज्ञानलेखक)

विज्ञानाचे पैलू मांडणारी पुस्तके बहुतेकदा मानवी अस्तित्वापलीकडच्या विषयांकडे दुर्लक्ष करतात. अध्यात्मविषयक लेखन वैज्ञानिक विषयांवर मौन बाळगते. दोन्ही विषयांची ज्ञानमीमांसा भिन्न असल्याने हे स्वाभाविकच, मात्र हे पुस्तक एकाच वेळी या दोन्ही रुळांवर धावणाऱ्या मानवी जीवनाचा सांगोपांग आढावा घेते…

मानवी बुद्धिमत्तेची व सर्जनशीलतेची झेप अफाटच आहे. मानवी प्रगती विज्ञान-तंत्रज्ञानापासून ते काव्य-शास्त्र-विनोदापर्यंत सर्वच क्षेत्रांची ओळख वेगाने बदलून टाकत आहे. एकेकाळी कविकल्पना वाटणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेने सर्वच क्षेत्रे व्यापून टाकली आहेत. विश्वाच्या पसाऱ्यात बिंदुमात्र समजला जाणारा मानवप्राणी आज विश्वाचे केंद्रस्थानच झाला आहे. मात्र या बदलाच्या युगात जग खरोखर स्वस्थ, सुखी, समाधानी होत आहे का? जगाला बदलून टाकणारा मानव कुठल्या दिशेला वाटचाल करीत आहे? भविष्यातील मानवी जीवन कसे असेल? जीवनाचा उद्देश काय आहे? सजीव-निर्जीवांची रहस्ये उलगडणारे विज्ञानच सर्वश्रेष्ठ व पुरेसे आहे का?

अफाट प्रगतीच्या या झंझावातात कुठेतरी कोणीतरी थोडेसे थांबून अशा प्रश्नांशी भिडायला हवेच. केव्हातरी मानवी जीवनाचे सिंहावलोकन करायला हवे. ‘जिनोम टू ओम’ हे पुस्तक हेच काम करते. अनेक मूलभूत प्रश्नांची चर्चा करते. हे पुस्तक अनेक धागे जोडते. विरोधी भासणाऱ्या टोकाच्या विविध संकल्पनांमधील एकत्व उलगडते- मानवी इतिहास व भविष्य, पौर्वात्य व पाश्चिमात्य विचार, जीवन व मृत्यू, शरीर व मन, तसेच विज्ञान आणि अध्यात्म अशा अनेक संकल्पनांतील.

हे पुस्तक विश्वाच्या उत्पत्तीपासून ते विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास रेखाटणारे एक शब्दचित्रच आहे. गुहेत राहणारा, आदिम प्रेरणांवर जगणारा मनुष्यप्राणी आता परग्रह कवेत घेत आहे. मानवी उत्क्रांतीच्या या सुवर्णयुगात आपले भान तर हरपत नाही ना, याचा विचार जगभरातील अनेक तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञांनी सातत्याने केला आहे. मानवी जीवनाचे ध्येय, मानव व जगाचा संबंध शोधताना हक्सली, श्रोडिंगर, ओपेनहाइमर, थोरो, मॅक्स मुल्लर आणि इतर अनेक पाश्चात्त्य विद्वान भारतीय तत्त्वज्ञानाकडे वळले. भारतीय दृष्टिकोनात असे काय खास आहे ज्यामुळे असे महान तत्त्वज्ञ त्याकडे आकर्षित झाले याबद्दल हे पुस्तक रंजक पद्धतीने माहिती देते. केवळ विज्ञानच नव्हे तर विविध दर्शनांच्या माध्यमातून भारतीय विचार मानव व जगाच्या संबंधांचा लेखक सविस्तर पण सोप्या रीतीने आढावा घेतात.

या पुस्तकाचे नावच त्यातील व्यापक विषयाचा आवाका स्पष्ट करते. सजीव पेशींतील डीएनएमध्ये त्या सजीवाची सर्व आनुवंशिक माहिती साठवलेली असते, या जनुकांचा पूर्ण संच म्हणजेच ‘जिनोम’. अनेकविध मानवी जैविक रेणूंचे संचही (ज्याला ओमिक्स असे संबोधतात) या संज्ञेतच समाविष्ट आहेत. जिनोम हे अर्वाचीन विज्ञानाचे प्रतीकच आहे. तर ‘ओम’ हे अध्यात्माचे प्रतीक! वैश्विक प्राण व चैतन्य सामावणारे. अनादी काळापासून या चैतन्याची अनुभूती अनेकांनी विविध प्रकारे घेण्याचा प्रयत्न केला आहे. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील सर्वधर्मपरिषदेत याचे सुंदर वर्णन केले होते. ज्याप्रमाणे अनेक मार्गांनी वाहणाऱ्या नद्या शेवटी एकाच समुद्राला येऊन मिळतात, त्याचप्रमाणे एकाच सत्याचा बोध कुठल्याही मार्गाने होतो. या वैश्विक सत्याला ओम या संज्ञेने संबोधले आहे.

विज्ञानाची किंवा अध्यात्माची एकएकटी मांडणी करणारी अनेक पुस्तके आहेत. विज्ञानाचे असंख्य पैलू मांडताना अशी पुस्तके मानव-केंद्रित मांडणी करतात व मानवी अस्तित्वापलीकडच्या अनेक विषयांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करतात. तसेच अध्यात्म संबंधित विषयांवरील लेखन वैज्ञानिक विषयांवर मौन बाळगते. याचे कारण दोन्ही विषयांची अत्यंत वेगळी असणारी ज्ञानमीमांसा (एपिस्टेमॉलॉजी). हे पुस्तक मात्र एकाच वेळी या दोन्ही रुळांवर धावणाऱ्या मानवी जीवनाचा सांगोपांग आढावा घेते. यामध्ये मानवी जीवनाला समृद्ध करणाऱ्या विविध शास्त्रज्ञांचे शोध आहेत, तसेच भारतीय दर्शनशास्त्रे, उपनिषदे, वेद, पुराणे यातील महत्त्वाचे संदर्भसुद्धा आहेत. प्रत्येक जीव (पिंड) व्यापक अशा ब्रह्मांडाचे सूक्ष्मस्वरूपच आहे, हा विचार जीवसृष्टीला एका पातळीवर आणतो व मानव, वनस्पती आणि प्राणीसृष्टी कशी परस्परावलंबी आहे, हे स्पष्ट करतो. स्वास्थ्याचा विचार करताना अध्यात्मच आपल्याला सर्वंकष दृष्टी देते. त्याशिवाय मानवी जीवन अपूर्णच आहे.

चहूबाजूंनी विकसित होणाऱ्या विज्ञानाकडे पाहण्याची नवी दृष्टी अध्यात्म कशी देऊ शकते, हे या पुस्तकात अनेक उदाहरणांतून स्पष्ट केले आहे. याचबरोबर विज्ञानही अनेकविध अध्यात्मिक परंपरांची नवी ओळखसुद्धा करून देते. मानवी जीवनाचे जैविक, सामाजिक व आध्यात्मिक पैलू समजावून घेताना विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही उपयोगी पडतात. विज्ञान व अध्यात्म दोन्ही मिळून मानवी दृष्टिकोन विकसित करतात, याचा अनुभव वाचकाला येतो. हे पुस्तक वाचणे म्हणजे एका कार्यशाळेत भाग घेण्यासारखे आहे. ते केवळ विविध विषयांची माहिती देत नाही तर लेखकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर विचार करण्यासही प्रवृत्त करते.

मानवाने पृथ्वीवर वर्चस्व गाजवले आहे आणि आपल्या कृतींचा पर्यावरणावर जो परिणाम झाला आहे तोच आपल्या अस्तित्वासाठी हानीकारक आहे. या पार्श्वभूमीवर विश्वाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन अध्यात्म आपल्याला देते. हे पुस्तक मानवतेचे आणि पृथ्वीचे भविष्य यावर चर्चा करते. मानवजातीच्या भविष्यासाठी विकसित होत असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान अध्यात्माशी जोडण्याचा सल्ला लेखक देतात. मानवतेच्या भविष्याकरिता विज्ञान व त्यापलीकडच्या प्रज्ञानाचा बोध आवश्यक असल्याचे लेखक सहजपणे उलगडून सांगतात. ‘मानवयुग’ (Anthropocene) ते ‘ओम युग’ (Omcene) हा प्रवास सर्वांचेच स्वास्थ्य आणि कल्याण साध्य करू शकतो. ‘सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया:।’ ही वैश्विक प्रार्थना सत्यात आणण्याकरिता हे पुस्तक नवा दृष्टिकोन देते.

या पुस्तकाचे लेखक आहेत, भारतात एकात्म वैद्याक विकसित करणारे शास्त्रज्ञ प्रा. भूषण पटवर्धन व इतिहास अभ्यासक इंदू रामचंदानी. ज्येष्ठ चिकित्सक-शास्त्रज्ञ गुरुराज मुतालिक व प्रख्यात शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची प्रस्तावना आहे. अध्यात्माचे अधिष्ठान हे भारतीय ज्ञान परंपरेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. भारतीय ज्ञानपरंपरा गतिशील जीवनाला तितकाच शाश्वत आधार पुरवतात. ज्ञानेश्वरांनी या परंपरेचे सुंदर वर्णन केले आहे.

तैसा व्यासाचा मागोवा घेतु ।

भाष्यकारांते वाट पुसतु ।

अयोग्यही मी न पवतु ।

कें जाईन ।।

याच परंपरेतील हे पुस्तक. अवश्य संग्रही असावे असे.

 ‘जिनोम टु ओम

लेखक – भूषण पटवर्धन व इंदू रामचंदानी

प्रकाशन – इंक पृष्ठे – ४४८ मूल्य – ७९९ रुपये