मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या थरामध्ये १४ वर्षे वयाखालील मुलांना सहभागी करून घेण्यास ७ ऑगस्ट २०१७ पासून मनाई केलेली आहे. तरीही यंदा मुंबई व ठाणे येथील बऱ्याच ठिकाणी हा न्यायालयीन आदेश धाब्यावर बसवून १४ वर्षांखालील मुलांना शेवटच्या थरावर चढण्यास भाग पाडले होते. वास्तविक न्यायालयीन आदेशाच्या पालनाची हमी राज्य सरकारने दिलेली आहे.  न्यायालयाच्या विरोधात या आयोजकांचे हे वर्तन  न्यायालयाचा अवमान करणारे (कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट) ठरते. ठाण्यातील टेंभी नाका येथील हा कार्यक्रम तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होत होता, की  ज्यांच्या सरकारने  न्यायालयाला असे काही होणार नाही याची हमी दिली होती. या वेळी बंदोबस्तासाठी असलेले पोलीस काय फक्त बघ्याचे काम करीत होते? असल्या गोष्टीवर आळा घालण्यासाठी संयोजकांवर कडक कारवाई व्हावी व भविष्यात त्यांच्यावर घातलेल्या केसेस पण मागे घेतल्या जाऊ नयेत तरच न्यायालयाची शान राहील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित परमानंद शेटये, डोंबिवली पूर्व

यंदाच भाजपला दहीहंडी दिसली!

गेली ५५ वर्षे मुंबईत शिवसेनेने मराठमोळय़ा सण व उत्सवांचा सांस्कृतिक वारसा जपला आहे. परिणामी शिवजयंती, गोकुळाष्टमी व गणेशोत्सव या उत्सवांवर शिवसेनेचेच वर्चस्व होते. त्यात राजकारणाचा लवलेश नसल्याने कोणतीही राजकीय टीकाटिप्पणी व शेरेबाजी नसायची. परंतु यंदा विशेषत: भाजपने जरा जास्तच भाषण व शेरेबाजी करीत अतिरेक केल्याचे दिसून आले. यापूर्वी त्यांना मराठी माणूस व त्याचे सण आणि उत्सव दिसत नव्हते. मुख्यमंत्री असताना फडणवीस कधीही दहीहंडी उत्सवांना भेटी देताना दिसले नाहीत. परंतु उपमुख्यमंत्री म्हणून ते वरळी, घाटकोपर आणि ठाणे येथे उपस्थित होते. एवढी वर्षे त्यांना मराठी माणूस, अस्मिता व मराठी भाषा दिसली नाही. परंतु आता मात्र  मतांची पेरणी करण्यासाठीच दहीहंडी व गणेशोत्सव यांचा वापर करण्याची व्यूहरचना असावी. त्यामुळे सण व उत्सवांचे पावित्र्य बाजूला ठेवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा, त्यासाठी येथील मंडळांना पैशाची खिरापत वाटून आपल्याकडे आकर्षित करण्याचा डाव यंदा दिसून आला.

 – पांडुरंग भाबल, भांडुप (मुंबई)

अन्यधर्मीय सणांत अशी गाणी असतात का?

हिंदू सण आता विनानिर्बंध साजरे करा, कारण आता हिंदूत्वाचे सरकार आहे असे मानणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या सणांमधील गाणी ऐकून सणांचे पावित्र्य राखण्याचा सल्ला दिला असता तर ते हिंदूत्वाला शोभून दिसले असते. राजकीय टीकेसाठीही उत्सवाच्या व्यासपीठाचा वापर करणे हेदेखील मुख्यमंत्र्यांच्या अपरिपक्वतेचे दर्शन घडवते. अन्य धर्मीयांच्या सणांत, कधी धार्मिक गाणी सोडून अन्य गाणी वाजविली जात नाहीत याची शिकवण हिंदूत्वाभिमानी आपल्या अनुयायांना कधी देणार?  नुसते हिंदूत्व जोपासणारे, हिंदूत्वाभिमान्यांचे सरकार म्हणून काय उपयोग?

रमेश वनारसे, शहापूर (जि. ठाणे)

सत्ताधाऱ्यांनी नको ते थर रचू नयेत

राज्य सरकारने २००१ साली क्रीडा धोरण जाहीर केले, त्या वेळी ५९ क्रीडा प्रकार होते. आता दहीहंडीच्या समावेशामुळे क्रीडा प्रकारांची संख्या ६० होईल! परंतु दहीहंडी ‘खेळाडूं’ना ५ टक्के आरक्षण कसे देणार? नोकरी देताना राज्य ऑलिम्पिक संघटनेची मान्यता लागते. गोविंदा असल्याचे प्रमाणपत्र कोण देणार? आधीच राज्यात अनेक खेळाडूंनी  बोगस प्रमाणपत्र सादर करून सरकारी नोकरी मिळविल्याच्या गोष्टी नुकत्याच चव्हाटय़ावर आल्या आहेत.  तेव्हा सरकारने प्रसिद्धीसाठी हंडय़ा उभारून नको ते थर रचू नयेत.

सुनील कुवरे, शिवडी (मुंबई)

हंडी फोडली, ती लोण्यासाठीच?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, ‘आम्ही ५० थर (आमदार) लावून सत्तेची दहीहंडी फोडली’ ..आणि आता काय सर्व मंत्री लोणी खायला बसले आहेत?

अरिवद करंदीकर, तळेगाव दाभाडे

हिंदूंनाही त्रास झाला तरी बेहत्तर..

‘गणेशोत्सवामध्ये साताऱ्यातच डॉल्बी सिस्टीम का वाजू नये?- खासदार उदयनराजे यांचा संतप्त सवाल’ ही बातमी (लोकसत्ता- २० ऑगस्ट) वाचली. उदयनराजे यांना मूठभर डीजे व्यावसायिकांच्या भांडवलाची आणि त्यांच्या कुटुंबाची चिंता आहे. पण अनेक आजारी नागरिकांची आणि ध्वनिप्रदूषणामुळे होणाऱ्या अगणित रोगांचे शिकार होणाऱ्या सामान्य जनतेच्या त्रासाची मात्र काळजी नाही. तात्कालिक राजकीय फायद्याचा विचार करून आपणच तथाकथित हिंदूधर्माची पताका उंचावण्यासाठी डीजे लावून, ढोलताशे वाजवून तसेच आवाजी फटाके वाजवून ध्वनिप्रदूषण करत, ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती पाण्यात विसर्जित करून जलप्रदूषण करत आणि आतषबाजी करणारे फटाके उडवून वायुप्रदूषण करत आहोत, हे आपल्या कसे लक्षात येत नाही?

 या आग्रहांमागे भूमिका दिसते ती अशी की, आम्ही आमची धार्मिक परंपरा जपण्यासाठी वटसावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाची कत्तलही करू आणि दसऱ्याला आपटय़ाच्या झाडांची, आंब्याच्या झाडांचीसुद्धा! जल, वायू, ध्वनी अशा सर्व ठिकाणी पर्यावरणाची वाट लागली तरी चालेल. पण आम्हाला रोखण्याचे धाडस जो करील – मग ते आमचे शांतपणे जगण्याची मनीषा बाळगणारे हिंदू बांधव का असेनात – त्यांना आम्ही धडा शिकवू. आम्हाला हिंदू धर्मात सुधारणेच्या नावाखाली जे आडवे येतील ते आमच्या प्रथा-परंपरांवर घाला घालणारे हिंदूद्वेषी आहेत; तेव्हा अशा देशद्रोह्यांना हिंदूधर्म रक्षणासाठी नेस्तनाबूत करणे आमचे कर्तव्यच आहे.. कारण आमच्या धार्मिक भावनांना दुखावण्याचा अधिकार यांना कुणी दिला? भारतात ८० टक्के हिंदू आहेत तेव्हा हे हिंदूराष्ट्रच आहे. त्यामुळे हिंदूंचे सण आणि प्रदूषण हिंदूच जास्त करणार, हे या नतद्रष्ट सुधारकांना कळू नये?

जगदीश काबरे, सांगली

मध्यस्थस्वीकारण्याची मानसिकता नाही

‘न्यायालयात जाऊन न्याय मिळतोच असे नाही!- न्या. धनंजय चंद्रचूड यांची स्पष्टोक्ती’ ही बातमी (लोकसत्ता- २० ऑगस्ट) वाचली. ‘कायदा जाणणारे सामाजिक कार्यकर्ते आणि सुबुद्ध नागरिकांनी मध्यस्थाची भूमिका वठवावी’ असेही मत न्या. चंद्रचूड यांनी व्यक्त केले. हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कुटुंब प्रमुखाची भूमिका संपुष्टात आली आहे व त्याचमुळे मध्यस्थाची भूमिका घेण्याची पात्रता नक्की कोणाची, हा प्रश्न समाजाला भेडसावतो आहे. आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यामुळे हल्ली कोणीही कोणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नसते. त्यातही कायदा जाणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी  मध्यस्थी करण्याची भूमिका वटवायचा प्रयत्न केल्यास त्यांना हे अधिकार दिले कोणी हा प्रश्न गूगलच्या जमान्यात समाजात उघडपणे विचारला जातो. त्यामुळेच कोणीही कोणाच्या वादात पडण्याचे टाळतात. त्याचा ताण न्यायालयावर पडतो आहे. हे सर्व कमी करण्यासाठी तातडीने गावोगावी लोकअदालतींची संख्या फार मोठय़ा प्रमाणात वाढवण्याची गरज आहे. शिवाय एवढय़ा मोठय़ा प्रमाणात खटले प्रलंबित असताना न्यायालयाला मिळणाऱ्या उन्हाळी सुटय़ा ही ब्रिटिशकालीन संस्कृती अजून संपुष्टात का येऊ शकत नाही हा प्रश्नही कधीतरी हाताळावा लागेल.

प्रवीण आंबेसकर, ठाणे

डोळे झाकल्याने अंधार होत नाही.. 

‘गडकरींचेच पंख कसे कापले जातात?’ हा देवेंद्र गावंडे यांचा लेख (२१ ऑगस्ट) वाचला आणि असे वाटले की जे काही गडकरींबद्दल घडते आहे तेच आपल्या देशात कुठल्याही सामान्य माणसाबद्दलही घडतच आहे. गडकरींना ज्या अनुभवांना सामोरे जावे लागते आहे, तशाच अनुभवांना प्रत्येक क्षेत्रातील अशा माणसांना सामोरे जावे लागते, ज्यांच्यात थोडीफार धडाडी असून ज्यांच्यापासून त्यांच्या वरिष्ठांना धोका असल्याचे जाणवते. योग्य आणि कर्तृत्ववान माणसाचे पंख कापण्याची ही परंपरा अगदी महाभारत काळापासून आपल्या देशात सुरू आहे. कदाचित द्रोणाचार्याना एकलव्याच्या रूपात आपला प्रतिस्पर्धीच दिसत असेल. गडकरींचे पंख कापले की आपली खुर्ची ‘सही सलामत’ राहील असा (गैर)समज करून घेणाऱ्यांनी जर गडकरींचे पंख कापले तर ह्यात काहीच नवल नाही. पण पंख कापणाऱ्यांनी एक मात्र लक्षात ठेवावे, डोळे झाकल्याने अंधार होत नाही. 

विनोद द. मुळे, इंदूर

घोस्ट रायटिंग- भूतलेखनकी परोक्ष लेखन’?

‘स्पष्टोक्तीपर्व.. ’  या अग्रलेखात (२० ऑगस्ट)  ‘भूतलेखन’ असा शब्द वाचला. तो ‘घोस्ट रायटिंग’साठी असल्यास त्यासाठी ‘परोक्ष लेखन’ हा शब्द  सुचवावासा वाटतो. भूतलेखन हा अनुवाद वाटतो, पर्याय  वाटत नाही. – अनुराधा आठवले, मुंबई

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers mail loksatta readers opinion loksatta readers letter zws 70