विजय तेंडुलकरमहेश एलकुंचवार आणि सतीश आळेकर या तिघांनी मराठी रंगभूमीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. यापैकी तेंडुलकर हे या दोघांचे प्रेरणास्थान. अगदी तरुण वयात अवतीभोवतीच्या वास्तवावर वैविध्यपूर्ण नाटके रचून या तिघांनीही आपली सर्जनशीलता आणि प्रगल्भता दर्शवली. लेखनाव्यतिरिक्त आळेकर दिग्दर्शक आणि अभिनेतेही आहेत. आणि आजही सक्रिय दिसतात. आत्ता-आत्ताच त्यांचे ‘ठकीशी संवाद’ हे करोना-काळात लिहिलेले नाटक रंगभूमीवर आले आहे. अनेक चित्रपटांतून ते तरुणाईच्या उत्साहाने भूमिकाही करताना दिसतात. तरुणपणीच, महाविद्यालयीन जीवनात नाटकांत काम करण्याची गोडी त्यांना लागली. महाविद्यालयीन स्पर्धांसाठी ते एकांकिका लिहू लागले. त्यांच्या ‘झुलता पूल’, ‘यमूचे रहस्य’, ‘दार कुणी उघडत नाही…’ यांसारख्या अनेक एकांकिका गाजल्या; ‘भिंत’ आणि ‘बस स्टॉप’ या एकांकिकांचे प्रयोग तर पुढल्या पिढीतही अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून होत राहिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) या संस्थेतून त्यांनी नाटकास सुरुवात केली. तेंडुलकरांचे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक पीडीएने जब्बार पटेल यांच्या दिग्दर्शनात सादर केले तेव्हा आळेकर त्यांचे सहदिग्दर्शक होते. या नाटकावरून वाद होऊन आळेकर, जब्बार पटेल यांच्यासह काही तरुण मंडळींनी बाहेर पडून ‘थिएटर अॅकॅडमी’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेेतर्फे त्यांनी ‘पडघम’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ ही नाटके सादर केली. काही अपवाद करता बहुतेेक सगळी नाटके आळेकरांनी स्वत:च दिग्दर्शित केली.

ते म्हणतात की, मला नाटक प्रयोगासहच सुचते. त्यातील रचना, पात्रे, त्यांच्या हालचाली, परस्परसंबंध, त्यांच्यातले अल्प-स्वल्पविराम हे नाटक लिहीत असतानाच माझ्या मनोमंचावर मी पाहत असतो. ‘‘मी माझ्या नाटकातून परंपरा नाकारली, परंतु आज मागे वळून पाहताना वाटते की आज मी त्या परंपरेचाच एक भाग बनलो आहे,’’ असे अलीकडेेच त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. थिएटर अॅकेडमीची नाटककार कार्यशाळा योजना असो की राष्ट्रीय नाट्य विद्यालय आणि पुण्यातील ललित कला केंद्राची जबाबदारी असो… ते नाटकाशी बांधलेले राहिले आहेत. त्यांच्या नाटकांची अनेक भाषांत भाषांतरे झाली. अनेक विदेशी विद्यापीठांतून ते अतिथी अध्यापक म्हणून जातात. नाट्यकलेच्या अभ्यासक्रमाला काहीएक सैद्धान्तिक जोड असावी, म्हणून ‘ललित कला केंद्रा’च्या पाठ्यक्रमानुरूप पुस्तके लिहवून घेण्याचा प्रकल्पही त्यांनी पार पाडला.

जीवनाकडे पाहण्याच्या तिरकस दृष्टिकोनातून त्यांची नाटके प्रसवलेली दिसतात. आपल्या नाट्यप्रवासावर त्यांनी ‘गगनिका’ हे सदर ‘लोकसत्ता’मध्ये लिहिले; ज्याचे नंतर पुस्तकही झाले. त्यांना अनेकानेक पुरस्कार मिळाले. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्माश्री, महाराष्ट्र राज्य रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, आंतरराष्ट्रीय फेलोशिप्स… आणि आता कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान पुरस्कार’. या सर्व उपलब्धीने आपण कृतार्थ आणि समाधानी आहोत, त्यातही ललित कला केंद्रातून त्यांच्या हाताखाली शिकून नाटक, चित्रपट आणि मालिका क्षेत्रांत नाव कमावणारे शिष्य ही आपली कमाई आहे असे ते म्हणतात. पण आजची तरुण पिढी वैयक्तिक अनुभवांच्या पलीकडे आपल्या नाटकातून आजचे सामाजिक, राजकीय वास्तव मांडत नाही, हे त्यांना खटकत असेल का?

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyaktivedh satish alekar marathi theatre writing director and actor amy