श्रीकांत विनायक कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अब्जानुअब्जावधींच्या मोहिमा आखत सौरमंडलात मानवी वस्तीयोग्य वातावरण निर्माण करू पाहणं हे जगातील काही मूठभर अतिश्रीमंत अन अतिसाहसी धंदेवाईकांनी जगाला दाखवलेलं स्वप्न लोभस आणि शक्य वाटलं तरी हाच पैसा, हेच श्रम, हीच चिकाटी आहे तो पृथ्वी ग्रह वाचवण्यासाठी, टिकवण्यासाठी लावणंच समस्त मानवजातीकरता हितकारक ठरणार आहे.

अर्नोल्ड टॉईन्बी या अमेरिकन इतिहास अभ्यासकाने समाजाच्या, संस्कृतींच्या जडणीघडणीचा एक पॅटर्न नमूद करून ठेवला आहे. कधी एखाद्या पूर्णतः नवीन अशा सामाजिक वा अभूतपूर्व अशा नैसर्गिक समस्येस समाज सामोरा जातो तेव्हा त्या अनोळखी समस्येवर मात करण्यासाठी एखादी नावीन्यपूर्ण उपाययोजना अस्तित्वात येते, नावीन्यपूर्ण मार्ग चोखळला जातो. तो यशस्वी झाला तर समाजाची पुढची वाटचाल या नव्या मार्गाने होत रहाते. काही काळाने त्यातूनही काही नवीन समस्या उभ्या रहातात अन त्यावर परत नवीन मार्ग काढले जातात. थोडक्यात समतोल आणि ओव्हरबॅलन्स यांची पारडी आलटून पालटून जड होत रहातात. म्हणजे प्रत्येक यशस्वी ठरलेला मार्ग हा पुढे जाऊन समतोल घालवतो अन तो परत साधण्यासाठी परत काही नवीन मार्ग चोखाळावे लागतात.

हेही वाचा : कथित देशहितासाठीचे हत्याकांड

आजच्या या आधुनिक युगात होणारे बदल वा सामाजिक स्थित्यंतरं ही जास्त गुंतागुंतीची झालेली आहेत. कारण हे बदल फार झपाट्यानं होताहेत किंवा ते फार व्यापक स्वरुपाचे असतात असं नाही आणि ते एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये होण्याची गरज निर्माण आहे. उदाहरणार्थ, पर्यायी इंधनव्यवस्था ही जास्त महत्वाची ठरवायची की कार्बन डेट ? की लयास चाललेली वनसंपदा ? की पाणीटंचाई अन शेतकऱ्यांच्या आत्महत्या ?की वाढती महागाई की वाढती बेरोजगारी ? की आपल्या शेजाऱ्यांची अण्वस्त्रवापराची धमकी की दहशतवाद की काळा पैसा, इत्यादी इत्यादी…

आणि तसं पाहू गेलं तर आजच्या काळातल्या समस्या या केवळ एखाद्या व्यक्तीपुरत्या, समाजापुरत्या वा देशापुरत्या न रहाता त्यांना एक वैश्विक परिमाण प्राप्त होत जात आहे. जे काही होऊ घातलं आहे ते या साऱ्या पृथ्वीवर परिणाम घडवणारं आहे, जागतिक परिणाम करणारं आहे. या साऱ्याचा एकत्रिक, एकात्मिक विचार अन अभ्यास होणं हे आत्यंतिक गरजेचं आहे. हातातून वेळ निसटून चाललीये. हा अभ्यास एकत्रित होत नाहीये कारण यात अंगभूत असलेला परस्परसंबंध नजरेआड होतोय. स्थानिक, प्रांतीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरची नेतृत्वं ही या द्रष्टेपणात, सर्वांगीण विचारसरणीत कमी पडत चालली आहेत. या नेतृत्वांना माहिती पुरवाणारी, अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणारी यंत्रणाही आहे, असते. पण हा अभ्यास असूनही मग हे तोकडेपण कसं अन का रहातं?

हेही वाचा : बाजारकेंद्री, तरीही क्रांतिकारी कला…

या तोकडेपणास वा या अवस्थेस आपली मानवजात पोहोचली आहे यास कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी गेल्या काही शतकांमध्ये येत गेलेली तथाकथित आधुनिकता अन आपला तथाकथित शास्त्रीय दृष्टीकोन हे एक अत्यंत महत्वाचं कारण असावं. निसर्गाशी पूर्णपणे तुटत गेलेली अन तुटू दिलेली नाळ ही आपल्याकडून घडलेली सर्वात घातक चूक हे त्यामागचं कारण असावं. निसर्गाची रहस्यं जाणून घेणं म्हणजे निसर्गाची पिळवणूक करायची मक्तेदारी घेणं असंच आपल्याला वाटतं आहे. आपण निसर्गाचे मालक असल्याप्रमाणे व्यवहार करण्यासारखी ही मूर्ख प्रवृत्तीच आपल्या विनाशाचं कारण होत चालली आहे.

आधुनिक विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातली एक अत्यंत महत्वाची त्रुटी म्हणजे मन, संवेदना, भावना वगैरे गोष्टी बाजूला सारून केवळ तर्कनिष्ठ राहून फक्त बुद्धीच्या कसोटीवर होणारी पारख. माणसासारख्या माणसाला यांत्रिकपणे विचार करावयास भाग पाडणं, त्यातला ‘माणूस’च मारून टाकणं, केवळ ‘रॅशनल’ विचार करणं. यातनं मानवी विचारसरणीच बदलून गेली. मानव असंवेदनशील होत गेला, शास्त्राच्या कसोटीवर उतरत नाही म्हणून अध्यात्म हे भंपक समजलं जाऊ लागलं, सलोख्याची जागा स्पर्धेनं घेतली, नैसर्गिक संपदेची वृद्धी, राखणं तर सोडाच, केवळ लूटमार केली गेली, निसर्ग ओरबाडून टाकत वेठीस धरला गेला.

हेही वाचा : बुडणाऱ्या शहरांना पाणथळींच्या रक्षणाचे भान कधी येणार?

यासंदर्भात कॅरलीन मर्चंट या अमेरिकन इको-फेमिनिस्ट विदुषीचं म्हणणं विचार करावयास भाग पाडतं. त्या म्हणतात, In investigating the roots of our current environmental dilemma and its connections to science, technology and the economy, we must re-examine the formation of a world-view and a science which, by re-conceptualizing reality as a machine rather than a living organism, sanctioned the domination of both nature and women. The contributions of such founding ‘fathers’ of modern science as Francis Bacon, William Harvey, Rene Descartes, Thomas Hobbes and Isaac Newion must be re-evaluated.

आपलं हे विज्ञानयुग शास्त्रीय ज्ञानावर मदार ठेवून आहे. शास्त्रीय पद्धतीने एखादी गोष्ट सिद्ध होत असेल तरच ती स्वीकारली जाणं हा प्रघात रुजलेला आहे. बुद्धीपलिकडे जाऊन काही गोष्टी आंतरिक जाणीव वा मानसिक पातळीवर वा संवेदनांद्वारे, अनुभूतींद्वारे जाणून घेणं ही क्षमताच लोप पावत चाललीये. किंबहुना असं काही असू शकतं यावर विश्वास ठेवणंच कठीण झालंय. मी इथे अर्थातच अंधश्रद्धा वा दांभिक अन पोकळ धार्मिकता गृहीतच धरत नाहिये, त्या प्रकारचा समाजघटक आपण सोडूनच देऊ. आपण गृहीत धरूया सुजाण, खुल्या मनाचा, म्हटलं तर अभ्यासू व जिज्ञासू वर्ग. तोही विज्ञानाधारित जीवनाच्या चौकटीमध्ये अडकलाय. विज्ञाननिष्ठ पद्धती आणि ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ यासारख्या अतितार्किक आणि अतिचिकित्सक विचारसरणीच्या अतिरेकी आग्रहामुळे आपल्या नकळत आपली कृतीत निसर्गाशी तादात्म्य राहिनासं झालं आहे.

हेही वाचा : शिक्षणाच्या माध्यमातून जग बदलण्याचे स्वप्न बघणारा एक भूलतज्ज्ञ…

निसर्गाची समतोल राखण्याची मानवी आकलनापलीकडची अशी काही पद्धत असते. त्यात ‘जीवो जीवस्य जीवनम’प्रमाणे अनेकविध पातळ्यांवर पर्यावरणाचा समतोल राखला जात असतो. यात चढउतार होत राहिले तरी कालपरत्वे मोठ्या प्रमाणावर समतोलच आढळतो. आज मानव निसर्गापासून जेवढा दुरावला आहे तेवढा आतापर्यंतच्या इतिहासात, कुठल्याही काळी कुठल्याही युगात दुरावलेला नव्हता. आज इकॉलॉजी, इकोफ्रेंडली, ग्रीन, सेंद्रीय, ऑर्गॅनिक अशा शब्दांचं जणू पेवंच फुटलंय, उठसूट हे शब्द वापरले जाताहेत. अरे, पण यांचा अर्थ वा खरी व्याप्ती तरी जाणवते आहे का? केवळ आपले त्रास वाढताहेत म्हणून नजरेत आलेल्या या संकल्पना आहेत. तथाकथित आधुनिक जगण्यात या संकल्पना आपल्या गावीही नव्हत्या. पूर्वीची आपल्या पूर्वजांची जीवनशैली त्यांच्याही नकळत पूर्णतः निसर्गानुकुल होती, निसर्गनियमांच्या भोवती गुंफली गेलेली होती. या अशा पर्यावरण अन पर्यायाने खऱ्याअर्थी जीवनपूरक जीवनशैलीस, ‘ऑर्गनिक’ विचारसरणीस आपण आधुनिक अन तथाकथित विज्ञाननिष्ठ जगण्याच्या नादात पूर्णपणे तिलांजली दिलेली आहे.

आपल्यासह सारा सभोवताल, आपला ग्रह हे सारे नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आज पोहोचले आहे. कितीही कठीण असलं, कितीही महागडं वाटलं तरी उंबरठ्यावरून परत फिरणं हे अत्यावश्यक आहे. परग्रहांवर, मंगळादींवर मानवी जीवनाची रुजवात करू पाहाणं, अब्जानुअब्जावधींच्या मोहिमा आखत सौरमंडलात मानवी वस्तीयोग्य वातावरण निर्माण करू पाहणं हे जगातील काही मूठभर अतिश्रीमंत अन अतिसाहसी धंदेवाईकांनी जगाला दाखवलेलं स्वप्न लोभस, रम्य आणि शक्य वाटलं तरी हाच पैसा, हेच श्रम, हीच चिकाटी आहे तो पृथ्वी ग्रह वाचवण्यासाठी, टिकवण्यासाठी लावणंच समस्त मानवजातीकरता हितकारक ठरणार आहे. सूर्यासारखा एखादा तारा अन त्याचा, जीवनायोग्य वातावरण लाभलेला एखादा ग्रह अशा या जोडीला ‘भुवन’ ही संज्ञा आहे… हे अमूल्य, अद्वितीय असं आपलं भुवन नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

sk3shrikant@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will the mankind try to save the earth from the destruction css