ठाणे : हिरानंदानी मेडोज येथील पवार नगरमध्ये एका कारच्या धडकेत ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या भागात सरावासाठी येणारे धावपटू तसेच आरोग्य सुदृढ रहावे म्हणून चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच धावपटू डॉ. महेश बेडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. शहरातील काही रस्ते हे सकाळी आणि रात्रीच्या वेळेत धावपटू आणि चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आरक्षित ठेवावे, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाण्यातील हिरानंदानी मेडोज, वसंत विहार, उपवन, येऊर या भागांत सकाळी आणि रात्रीच्या वेळेत अनेक धावपटू हे सरावासाठी येत असतात. शहरातील इतर भागांच्या तुलनेत या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ अतिशय कमी असते. बुधवारी रात्री मानपाडा परिसरात राहणारे वरूण शर्मा हे पवार नगर परिसरातून पायी जात होते. त्याचवेळी एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात अत्यंत भीषण होता, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. तसेच अपघातात कारच्या पुढील भागाचाही चुराडा झाला होता. याप्रकरणात पोलिसांनी आयुष मालवानी (१९) याला अटक केली आहे.

हेही वाचा – ठाकरे गटाला लक्ष्य करण्यासाठी पुनर्विकासाचा ‘पॅटर्न’ ; मुंबईतील ताकद वाढवण्यासाठी शिंदे यांची व्यूहरचना

काही महिन्यांपूर्वीच मुंबईतील वरळी येथील सी-फेस परिसरात धावपटू राजलक्ष्मी रामकृष्णन या धावत असताना त्यांना भरधाव कारने धडक दिली होती. या धडकेत राजलक्ष्मी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ठाण्यातील २०० हून अधिक धावपटूंनीही त्यांच्या सुरक्षेसाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना निवेदन देऊन धावपटूंच्या सुरक्षेबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर येऊर भागात चालण्यासाठी आलेल्या एका महिलेला कार चालकाने जोरदार धडक दिली होती. हा अपघातही भीषण होता. त्यात महिलेच्या पायाचा अस्थिभंग झाला. सुमारे तीन महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता वरुण यांचा अपघात झाल्यानंतर धावपटू तसेच परिसरात चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.

ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच धावपटू महेश बेडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये ठाण्यात धावपटू तसेच आरोग्य चांगले राहावे यासाठी चालणाऱ्या नागरिकांना रस्ते उपलब्ध नसल्याचा मुद्दा उपस्थित करत ही बाब अतिशय दुर्दैवी असल्याचेही म्हटले. शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची वर्दळ वाढण्याची शक्यता असून अपघातांच्या संख्येतही वाढ होणार आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्रीच्या वेळेत काही रस्ते धावपटूंच्या सरावासाठी आणि चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आरक्षित ठेवून त्या रस्त्यावर रहदारी बंद ठेवावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंनी शिंदेपुत्राचे फाजील लाड केले, आता…”, संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेंना टोला!

पवार नगर, उपवन येथील रस्त्यावर वाहनांची अधिक रहदारी नसते. त्यामुळे वाहने चालविण्याच्या सरावासाठी तसेच रात्री आणि पहाटेच्या वेळेत भरधाव कार चालविणारे या ठिकाणी मोठ्याप्रमाणात येत असतात. अनेकदा वाहन चालक मद्यप्राशनही करतात, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the terrible accident in thane the runner dr mahesh bedekar letter to chief minister regarding road ssb