बदलापूरः शहरातल्या विविध भागातील मोकळ्या जागांवर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या आठवडी बाजारांना आता स्थानिक भाजी विक्रेत्यांनी विरोध केला आहे. हे बेकायदेशीरपणे शहरात सुरु असणाऱ्या आठवडी बाजारांवर कारवाई करुन, हे आठवडी बाजार बंद करा अन्यथा आमरण उपोषणाला बसू असा इशारा देत, बदलापुरातील स्थानिक भाजी विक्रेत्यांनी सोमवारी कुळगाव बदलापूर नगरपालिकेवर धडक मोर्चा नेला. बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापूर शहरात दिवसेंदिवस नवनवे गृहसंकुल प्रकल्प उभे राहत आहेत. प्रत्येक आठवड्याला अनेक कुटुंबे बदलापुरात स्थायिक होण्यासाठी स्थलांतरीत होतात. त्यामुळे येथील बाजारपेठ आणि फिरत्या विक्रेत्यांची संख्याही गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच शहरातील विविध भागांत वेगवेगळ्या दिवसांचे आठवडे बाजारही मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. मध्यमवर्गीयांसाठी हे बाजार अतिशय उपयुक्त ठरत असून त्याला चांगला प्रतिसादही आहे. अनेक स्वस्तातल्या वस्तू येथे मिळत असल्याने सर्वच बाजारांत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. मात्र याच आठवडी बाजारांना आता स्थानिक भाजी विक्रेत्यांनी विरोध सुरू केला आहे. या आठवडी बाजारांमुळे नियमित भाजी विक्रेत्यांचा व्यवसाय रोडावला आहे. फक्त भाजी विक्रेते नाही तर भांडी, कपडे आणि इतर वस्तू विक्रेतेही यामुळे त्रस्त असून त्यांच्याही व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्या आठवडी बाजाराविरुद्ध बदलापुरातील भाजी विक्रेत्यांनी गेल्या आठवड्यात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार बहुजन मुक्ती पार्टीच्या निलेश येलवे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. आमच्या मागणीवर तोडगा निघत नाही आणि या आठवडी बाजारांवर कारवाई करून, हे आठवडी बाजार बंद होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन स्थगित करणार नाही. तसेच आम्ही आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इसाराही यावेळी निलेश येलवे आणि भाजी विक्रेता संघाचे बदलापूर अध्यक्ष सुरेश उर्फ मामा जवळेकर यांनी दिला आहे.

हेही वाचा – डोंबिवलीतील ५८ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणातील सात प्रस्ताव नियमानुकूलसाठी नगररचना विभागात दाखल

पालिकेनेच केला होता ठराव

आठवडी बाजारांमध्ये चोरी, पाकिटमारी, सोनसाखळी चोरी असे प्रकार वाढले होते. त्यामुळे पोलिसांच्या पत्रानुसार कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने २०१६ वर्षात आठवडी बाजार बंद करण्यासाठी पालिका सभागृहात ठराव केला होता. त्यानंतर शहरातील विविध बाजारांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करत बाजार बंद पाडले होते. मात्र कालांतराने हे बाजार पुन्हा त्याच ठिकाणी भरू लागले. यात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने अनेक विक्रेत्यांनी आपल्या जागाही निश्चित केल्या होत्या.

हेही वाचा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक, समाजमाध्यमांवरून दिली होती मारण्याची धमकी

पालिका कारवाई करणार

शहरातील खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या बाजारांची माहिती घेऊन कारवाई करू असे आश्वासन कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी दिले आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या नियमानुसार, रेल्वे स्थानक परिसरापासून दीडशे मीटर अंतरावर फेरीवाला मुक्त परिसरा असावा याबाबत, नियमावली असून त्याप्रमाणे, स्थानिक भाजी विक्रेत्यांनी देखील या परिसरात भाजी विक्रीसाठी बसू नये अन्यथा, त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल असे देखील सांगितले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur close the weekly market vegetable sellers of the city hit the municipality ssb