डोंबिवली – डोंबिवली क्षेत्रात साठ वर्षापूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून औद्योगिक क्षेत्र विकसित केले. त्यावेळी औद्योगिक क्षेत्र आणि निवास क्षेत्र यांच्यामध्ये एक संरक्षित पट्टा म्हणून चार ते पाच किलोमीटरचा बफर झोन (झालर पट्टी) नियोजनकारांनी येथील एमआयडीसीत प्रस्तावित केला होता. परंतु, तत्कालीन राजकारणी मंडळींनी दबावतंत्राचा वापर करून या झालर पट्टीवर आपले वर्चस्व दाखवून तेथे निवासी संकुले उभारण्यासाठी पुढाकार घेतला.

एमआयडीसीत झालरपट्टीत यापूर्वी उभारण्यात आलेली निवास संकुले ही कंपन्यांना एकदम खेटून आहेत. तत्कालीन राजकारणी मंडळींनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेल्या या कृतीचा आता सामान्यांना सर्वाधिक त्रास होत आहे. त्यावेळी झालर पट्टीत स्वस्तात घर घेतलेली मंडळी आता आहे ती जागा सोडण्यास तयार नाहीत. या जागांचे भाव आता दामदुप्पट झाले आहेत. आमची घरे गगनचुंबी होतील या विचारात असलेली ही मंडळी घरात कंपन्यांचा धूर येतोय तरी घरे सोडण्यास तयार नाहीत, असे चित्र डोंबिवली एमआयडीसीत आहे.

हेही वाचा >>> Dombivli MIDC Blast: बॉयलर स्फोटानंतर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया, “अतिधोकादायक केमिकल बनवणाऱ्या कंपन्या..”

एमआयडीसी क्षेत्राची नियोजनकार ही एमआयडीसी आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी अधिकारवाणीने कधीही या भागावर स्वताचे नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे एमआयडीसीचे औद्योगिक विभागासाठी राखीव असलेले ५०० हून अधिक भूखंड आजदे, सागर्ली आणि डोंबिवली शहरातील काही भूमाफियांनी टोलेजंग बेकायदा इमले बांधून हडप केले आहेत.

या बेकायदा इमल्यांना एमआयडीसीची बांधकाम परवानगी नाही. या बेकायदा इमारतींच्या तक्रारी एमआयडीसीत दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी फक्त कारवाईच्या नोटिसा देऊन भूमाफियांशी संगनमत करून या बेकायदा इमल्यांना वेळोवेळी अभय दिले. आता औद्योगिक क्षेत्रात निवासी संकुले अधिक प्रमाणात दिसत आहेत. औद्योगिक आणि निवासी क्षेत्र यांच्या कोणत्याही सीमारेषा आता शिल्लक राहिल्या नसल्याने येत्या काळात कंपन्यांमध्ये काही दुर्घटना घडल्यास लगतच्या नागरी वस्तीला त्याची मोठी झळ बसणार आहे.

या विषयावर राजकीय मंडळी मतपेटीवर डोळा ठेऊन असल्याने डोंबिवली एमआयडीसीतील निवासी बेकायदा संकुले, औद्योगिक विभागाचे हडप केलेले जाणार भूखंड याविषयी कोणीही काहीही बोलण्यास तयार नाही. आपण डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात फक्त तीन वर्षाचे सेवेकरी आहोत या विचारातून अधिकाऱ्यांनी कधीही आक्रमक भूमिका घेत एमआयडीसीतील झालर पट्टीतील, औद्योगिक राखीव भूखंडांवरील बेकायदा इमले तोडण्यासाठी पुढाकार घेतला नाही, असे याविषयीच्या तक्रारी करणारे नागरिक सांगतात.

हेही वाचा >>> Dombivli MIDC Blast: डोंबिवली बॉयलर स्फोट प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले, “घटना…”

आता औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण, काही दुर्घटना घडून नुकसान झाले तर पहिला दोष कंपनी मालक, चालकांना दिला जातो. आपले निवासी क्षेत्र नियमबाह्य औद्योगिक क्षेत्रात घुसले आहे या विषयावर कोणीही उघडपणे बोलण्यास तयार नाही. सुरूवातीच्या काळात नियोजनबध्द विकासित केलेल्या डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रात आखीव रेखीव रस्ते, कंपनी भूखंड होते. नंतर बंद पडलेल्या, मोकळ्या भूखंडावर बेकायदा इमले बांधण्याची मोठी स्पर्धा आजदे, सागर्ली भागातील भूमाफियांनी सुरू केली. एमआयडीसीचे आखीव नियोजन कोलमडण्यात हे बेकायदा इमले आणि नष्ट केलेला बफर झोन ही दोन मोठी कारणे आहेत, असे स्थानिक रहिवासी सांंगतात.

प्रत्येक औद्योगिक पट्ट्याला बफर झोन असतो. डोंबिवली एमआयडीसीत शिळफाटा रस्त्यालगत या झोनची आखणी नियोजनकारांनी केली होती. परंतु, तत्कालीन काही मंडळींनी मोकळी असलेली ही झालरपट्टी बेकायदा इमले बांधून हडप केली आणि एमआयडीसी निवासी, औद्योगिक विभागाच्या नियोजनाला धक्का लावला. राजू नलावडे- स्थानिक रहिवासी.