बदलापूरः महावितरणतर्फे सध्या अत्याधुनिक असे टीओडी (टाइम ऑफ डे) मीटर लघुदाब वीज ग्राहकांकडे बसवले जात आहेत. मात्र या मीटरवरून बदलापुरात सोमवारी महावितरण कार्यालयात गोंधळ पाहायला मिळाला. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी महावितरण कार्यालयात धडक देत या मीटरमुळे अवास्तव बिले येत असून महावितरणाने ग्राहक, गृहसंकुले यांच्या संमतीशिवाय सक्तीने मीटर बसवू नये अशी मागणी केली. यामुळे कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. मात्र हा राज्यभर सुरू असलेला प्रकल्प असून अवास्तव बिलाच्या तक्रारी असल्यास त्या सोडवू असे महावितरणाचे कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांनी दिली.

सध्या राज्यभर टीओडी अर्थात टाईम ऑफ डे या तत्वावर आधारीत मीटर घरगुती ग्राहकांकडे बसवले जात आहेत. कल्याण परिमंडळातत आत्तापर्यंत दोन लाख २६ हजार ग्राहकांकडे टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. हे मीटर प्रीपेड नाहीत. ज्यांच्याकडे हे मीटर बसवले जात आहेत, त्यांना पूर्वीप्रमाणेच विजेच्या वापरानंतर मासिक बिल दिले जात असल्याची माहिती कल्याण कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे. या मीटरच्या माध्यमातून कोणत्या वेळेला किती वीज वापर होतो आहे, याची अचूक माहिती संबंधित ग्राहक आणि महावितरणला मिळते. हे मीटर विनामुल्य लावले जात असून मीटरबाबत पसरवण्यात येणाऱ्या गैरसमज आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. मात्र बदलापूर शहरातील काही ग्राहकांना टीओडी मीटर बसवल्यानंतर अवास्वत बिले आली. त्यामुळे शहरात संताप व्यक्त होत होता.

गेल्या आठवड्यात बदलापूर दौऱ्यावर आलेल्या स्थानिक खासदार सुरेश म्हात्रे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना या मीटरची सक्ती न करण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यानंतरही हे मीटर बसवले जात असल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सोमवारी महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश देशमुख, काँग्रेसचे संजय जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे किशोर पाटील आणि इतर पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी मीटर सक्ती बंद करण्याची मागणी केली. ग्राहक आणि रहिवासी संकुलांच्या संमतीशिवाय मीटर बदलणे बंद करा अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

मीटरचा फायदा काय

महावितरणाचे जनसंपर्क अधिकारी विजय दुधभाते यांनी दिलेल्या माहितीनुसार टीओडी मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून मीटर महावितरणच्या सर्व्हरला जोडलेले असते. त्यामुळे मीटरचा रिअल टाइम डाटा महावितरणकडे उपलब्ध होतो. त्यामुळे मीटर नादुरुस्त झाल्याची माहिती तत्काळ मिळते. मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होणार आहे. यात मानवी हस्तक्षेपाला वाव नाही. ग्राहकांनाही अचूक आणि वेळेवर बिले मिळतील. हे अत्याधुनिक मीटर असल्याने यात ग्राहकाला प्रत्येक तासाला आणि, दिवसाला किती वीजवापर केला ते मोबाईलवर पाहता येईल. तसेच मीटर बसवण्यासाठी ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार पडणार नसून केंद्र सरकारच्या निधीतून यासाठी सवलत देण्यात आली आहे.

बदलापूर मंडळातील २ लाख २५ हजार ग्राहकांपैकी ४३ हजार ग्राहकांचे मीटर बदलून टीओडी मीटर लावण्यात आले आहे. मात्र अतिरिक्त बिलाच्या तक्रारी अगदीच नगण्य आहेत. अशा काही तक्रारी आल्यास त्या तातडीने सोडवू. नागरिकांच्या मागणीप्रमाणे त्यांना विचारात घेऊन मीटर बसवू. – आनंद काटकर, कार्यकारी अभियंता, बदलापूर विभाग, महावितरण.