ठाणे : राज्य घटनेने दिलेल्या हक्कांमुळे स्त्रिया सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहेत, पण, संसदेत अजूनही त्यांच्या समान प्रतिनिधित्वाचे विधेयक प्रलंबित आहे, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत, प्राध्यापक हरी नरके यांनी शुक्रवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. पंचायत राज विधेयकामुळे मोठ्या प्रमाणात स्त्रिया सत्तेत येत असल्याने पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण यात सकारात्मक बदल होत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक महिला दिन आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिकेतर्फे आयोजित व्याख्यानमालेतील द्वितीय पुष्प शुक्रवारी गडकरी रंगायतन येथे प्रा. हरी नरके यांनी गुंफले. ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. या कार्यक्रमास ठाण्यातील ज्येष्ठ लेखिका अनुपमा उजगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रा. हरी नरके यांनी ‘सावित्रीबाई फुले आणि आजची स्त्री’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले यांचे विचार आज जसेच्या तसे लागू होतील असे नाही, काळ बदललेला आहे, आव्हाने बदललेली आहेत, प्रश्न बदललेले आहेत. काळ हा गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे आपली आपल्यालाच शोधावी लागतील. पण आज सावित्रीबाई आणि ज्योतीराव फुले असते तर त्यांनी कशी उत्तरे शोधली असती, याचा विचार करावा आणि आजच्या स्त्रियांनी समतोल भूमिका घेत विवेकवादाच्या आधारावर वाटचाल केली तर त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी निश्चितच अधिक बळ मिळेल आणि त्यांना आपला संपन्न विचारांचा वारसा पुढे नेता येईल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा – ‘पीएम किसान’ योजनेच्या लाभापासून ठाणे जिल्ह्यातील हजारो शेतकरी वंचित, महसूल विभागातून उडवाउडवीची उत्तरे

सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचा संपूर्ण संघर्ष हा सामान्य माणसाला संधी मिळाली पाहिजे, सामान्य माणसांमध्ये सुद्धा प्रतिभा असते, हे सांगणारा होता. विजय भटकर, सत्यनारायण गंगाराम पित्रोदा म्हणजे सॅम पित्रोदा, जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर अशी कितीतरी सामान्य कुटुंबातील माणसे यांनी जे काम केले, त्यातून देशाची प्रगती झाली. देश अमुलाग्र बदल करू शकला आणि यामागे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचाच विचार आहे. संधी मिळाली पाहिजे हा त्यांचा जो विचार होता, त्याचे आज दृश्य परिणाम दिसत असून सामान्य कुटुंबातील अशी असंख्य माणसं आज नवनव्या संधीचा फायदा घेऊन देशाच्या प्रगतीमध्ये सहभागी होत आहेत, असेही ते म्हणाले. मुलींना संधी आणि शिक्षण मिळाले पाहिजे. विज्ञान, पर्यावरण, निर्मिती या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीला बरोबरीचे स्थान असले पाहिजे, यासाठी सुद्धा सावित्रीबाईंचा संघर्ष होता आणि आज या संपूर्ण क्षेत्रामध्ये स्त्रीने पुरुषांबरोबरीने आपली भागीदारी नोंदवली आहे. आपला सहभाग नोंदवते आहे, यातूनच सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी जो लढा उभारला, त्याला यश येताना दिसते आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – ठाणेकरांपुढे पाणी टंचाईचे संकट; ठाण्यातील काही भागांत बुधवारी पाणी नाही

अहिल्याबाई होळकर, रमाबाई रानडे आणि सावित्रीबाई फुले यांना संधी देणारे त्यांचे पतीच होते, त्यामुळे पुरुष बदलत नाहीत, ते दुष्ट असतात, असे नाही, स्त्री हक्कांची चळवळ ही पुरुषविरोधी चळवळ नसून पुरुषांच्या अंहकार आणि वर्चस्वाच्या विरोधात आहे, असेही ते म्हणाले. आजही ५३ टक्के स्त्रिया या कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडतात, त्यात ७० टक्के स्त्रिया महानगरातल्या आहे, या वास्तवाकडेही त्यांनी लक्ष वेधले. ज्या देशात स्त्रियांची प्रगती होते, त्या देशाची प्रगती होते, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते, असेही ते म्हणाले. महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात जी पहिली शाळा सुरू केली, त्या भिडेवाड्याचे स्मारक करण्यासाठी शासनाने अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Equal representation bill pending in parliament says hari narke in thane ssb