ठाणे : ठाणे आणि घोडबंदर भागातील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यां‌वरून पालिकेच्या कारभारावर टिका होऊ लागली असून त्याची गंभीर दखल घेऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी तातडीने बैठक घेतली. ठाणे महापालिकेप्रमाणेच १२ तासांच्या आत खड्डे बुजविण्याचे नियोजन करा, अशा सुचना त्यांनी प्राधिकरणांना दिल्या आहेत. तसेच नागरिकांच्या तक्रारीची वाट पहात बसू नका, खड्डे दिसले की बुजवा, अशा सुचनाही त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाच्या पावसाळ्यात ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा यासाठी पालिकेने रस्ते नुतनीकरणाची मोहिम हाती घेतली. राज्य सरकारने दिलेल्या ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून २८३ रस्त्यांच्या बांधणीची कामे सुरू आहेत. त्यापैकी काही कामे पुर्ण झाली आहे तर, काही कामे अपुर्णावस्थेत आहेत. या कामांमुळे शहराच्या अंतर्गत भागातील प्रवास काही प्रमाणात खड्डेमुक्त झाला असला तरी, शहरातील महामार्गांवर पडलेल्या खड्ड्यांमधून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे, शहरातून जाणारे महामार्ग हे विविध प्राधिकरणांच्या अखत्यारित येतात. परंतु हे रस्ते पालिका हद्दीत येतात. त्यामुळे त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून पालिकेवर टिका होते. दरवर्षी हे चित्र दिसून येते. यंदाही हे चित्र कायम आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीत दररोजच्या रिक्षा तपासणी मोहिमेमुळे चालकांची पळापळ

ठाणे शहरातून जाणारा मुंबई-नाशिक आणि घोडबंदर भागातून जाणारा मुंबई-अहमदाबाद हे दोन महामार्ग शहर आणि शहराबाहेरील वाहतूकीसाठी महत्वाचे मानले जातात. या मार्गावरून सतत अवजड वाहनांची वाहतुक सुरू असते. मेट्रो प्रकल्प उभारणीमुळे दोन्ही महामार्गावरील रस्ते अरुंद झाले आहेत. यामुळे याठिकाणी कोंडीची समस्या निर्माण होते. हे दोन्ही महामार्ग आणि त्यावरील उड्डाणपुल विविध प्राधिकरणांच्या अखत्यारित येतात. त्यामध्ये मंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा समावेश आहे. घोडबंदर भागातील महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत परिसरात खड्डे पडले आहेत.

हेही वाचा >>> कल्याण : शिळफाटा रस्त्यावर गोळवलीजवळ लोखंडी सळ्यांचा वाहनांना धोका

याशिवाय, कापुरबावडी उड्डाण पुलाजवळही खड्डे पडले आहेत. नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी इतर प्राधिकरणांच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाकडून ही कामे सुरू करण्यात आली असली तरी, संबंधित प्राधिकरणांकडून मात्र खड्ड्यांकडे दुर्लक्ष होताना दिसून येत होते. या खड्ड्यांवरून टिका होऊ लागल्याने आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी तातडीने बैठक घेऊन त्यांना ठाणे महापालिकेप्रमाणेच १२ तासांच्या आत खड्डे बुजविण्याचे नियोजन करा, अशा सुचना दिल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fill potholes within 12 hours notice to other authorities of municipal commissioner ysh