कल्याण : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या मांगरूळ गावाजवळील डावलपाडा येथील सहा जणांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. याशिवाय खुनाचा प्रयत्न आणि इतर प्रत्येक गुन्ह्यात सहाही आरोपींना प्रत्येकी १० वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी ७० हजार रूपये दंड ठोठावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणात डावलपाडा येथील शेतकरी सुरेश सावळाराम म्हात्रे, रमेश सावळाराम म्हात्रे, शत्रुकन सुरेश म्हात्रे, जितीन सुरेश म्हात्रे, प्रमोद रमेश म्हात्रे, दर्शन सुरेश म्हात्रे यांना जन्मठेप आणि इतर गुन्ह्यात प्रत्येकी १० वर्ष शिक्षा भोगावी लागणार आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. संगीता फड, आरोपींतर्फे ॲड. जी. बी. चव्हाण, ॲड. ए. वाय. पत्की यांनी काम पाहिले. १५ जखमी साक्षीदारांच्या साक्षी, सबळ पुराव्याच्या आधारावर न्यायालयाने हा निर्णय दिला, असे ॲड. फड यांनी सांगितले.

आरोपींनी डावलपाड्यातील ज्ञानदेव राघो राणे यांचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला होता. त्याच बरोबर दत्ता अनंता राणे, अनंता राणे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. राणे कुटुंबातील महिलांना आरोपींनी लाकडी दांडके, फावडे, कुऱ्हाडी, दगडविटांनी मारहाण केली होती. या गुन्ह्याप्रकरणी राणे कुटुंबीयांनी हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मार्च २०१८ मध्ये ही घटना डावलपाडा येथे घडली होती.

विशेष सरकारी वकील ॲड. संगीता फड यांनी सांगितले, राणे कुटुंबीय आणि म्हात्रे कुटुंबीय डावलपाडा गावात शेजारी राहतात. गावात सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटाराची व्यवस्था नाही. राणे कुटुंबीयांनी घरासमोरील अंगणात कपडे धुतले किंवा सफाईसाठी पाणी ओतले की ते सांडपाणी शेजारच्या सुरेश म्हात्रे यांच्या घरासमोरून वाहत होते. यावरून राणे, म्हात्रे कुटुंबीयांमध्ये कुरबुऱ्या सुरू होत्या. ३ मार्च २०२८ रोजी राणे कुटुंबीयांतील पुष्पा, माधुरी आणि दर्शना राणे या घरासमोर उभ्या असताना दर्शन म्हात्रे, प्रमोद म्हात्रे यांनी त्यांच्या बरोबर घरासमोरून वाहणाऱ्या सांडपाण्यावरून भांडण सुरू केले. त्यावेळी राणे कुटुंबीयांमधील ज्ञानदेव राणे, अनंता राणे म्हात्रे कुटुंबीयांना महिलांना शिवीगाळ करू नका म्हणून समजविण्यासाठी गेले. म्हात्रे कुटुंबीयांनी राणे यांच्या घराकडून वाहत येणारे पाणी आपल्या दारासमोरून वाहू नये म्हणून तेथे दगड, दगडी भुकटीचा बांधा घालून पाणी राणे यांच्या घरासमोर तुंबून राहील अशी व्यवस्था केली.

घरासमोर पाणी तुंबून राहू लागल्याने राणे कुटुंबीयांनी म्हात्रे यांना तो बांध काढण्याची मागणी केली. म्हात्रे कुटुंबीयांंनी त्यास नकार दिला. सांडपाण्याच्या विषयावरून संतप्त झालेल्या सुरेश म्हात्रे, जितीन म्हात्रे आणि शत्रुकन म्हात्रे यांनी हातात कुऱ्हाड, दांडके घेतले. यावेळी रमेश म्हात्रे यांनी आता राणे कुटुंबीयांना संपून टाकायचे अशी चिथावणी इतर आरोपींना दिली. सुरेश आणि इतरांनी ज्ञानदेव राणे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घातले. दत्ता राणे, अनंता राणे, नाना राणे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. राणे कुटुंबीयांमधील महिला आणि इतर अशा १५ जणांना गंभीर जखमी केले. गंभीर जखमी ज्ञानदेव यांच्यावर तीन दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनतर त्यांचा मृत्यू झाला. हिललाईन पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक केली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan district and sessions court judge waghmare sentenced six from davalpada to life imprisonment in ambernath sud 02