पक्षकारांना लोक न्यायालयात सहभागी होण्याचे आवाहन
बदलापूर : महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ांतील सर्व तालुका, कौटुंबिक, कामगार, सहकार आणि इतर न्यायालयांमध्ये येत्या १० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत भरणार आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख आर. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासून या लोकअदालतीचे कामकाज चालेल. विविध प्रकारची प्रकरणे तडजोडीसाठी येथे ठेवली जाणार असून सर्व पक्षकारांनी या अदालतमध्ये सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तंटे सामोपचाराने मिटवण्यासाठी लोक न्यायालयांचा उपक्रम फायदेशीर ठरत असल्याचे गेल्या काही वर्षांतल्या लोक न्यायालयांच्या अनुभवांवरून समोर आले आहे. त्यामुळे लोक न्यायालये आयोजित करून तंटे सामोपचाराने मिटवण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय लोक न्यायालयांचे आयोजन केले जाते. उभय पक्ष यात सहभागी होऊन तडजोडनामा सादर करत तंटे मिटवतात. गेल्या वर्षांत करोनाच्या संकटामुळे अवघे दोनच लोकन्यायालये पार पडली. यंदाच्या वर्षांत चार लोकन्यायालयांचा कार्यक्रम यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. त्यातील पहिली लोकन्यायालय येत्या १० एप्रिल रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार ठाणे आणि पालघर जि’ाातील सर्व प्रकारच्या न्यायालयांमध्ये या लोकन्यायालयांचे आयोजन केले जाणार आहे. यात दिवाणी स्वरूपाची, फौजदारी स्वरूपाची तडजोडीस पात्र, वैवाहिक स्वरूपाची, १३८ एन. आय. अॅक्टअन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुलीची प्रकरणे, मोटर अपघात नुकसानभरपाई, कौटुंबिक वाद, कामगारविषयक तंटे, भूसंपादन प्रकरणे, वीज व पाणीविषयक देयक प्रकरणे, महसूल आणि दाखल पूर्व प्रकरणे या लोक न्यायालयात तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. त्यामुळे उभय पक्षकारांनी या संधीचा फायदा घेऊन आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोकन्यायालयात दाखल करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्राधिकरणाशी थेट संपर्काचे आवाहन
दाखल पूर्वप्रकरणांबाबत ठाण्याच्या जिल्हा विधि सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधि सेवा समिती यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे. तसेच ठाणे जिल्हा न्यायालय परिसरात पहिल्या मजल्यावरील सेवा सदन येथे जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव एम. आर. देशपांडे यांनी केले आहे.
