बदलापूर : मुरबाड नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर येथील भाजपातील फुट चव्हाट्यावर आली होती. त्यानंतर येथील भाजपच्या दहा नगरसेवकांपैकी नऊ नगरसेवकांनी आपला स्वतंत्र गट तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या नव्या गटाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पालिकेतील भाजपच्या सत्तेसोबतच वर्चस्वही संपुष्टात आल्याचे बोलले जाते. स्थानिक भाजप आमदारांना हा धक्का मानला जातो.

मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार किसन कथोरे अनेक वर्षे आमदार आहेत. येथील मुरबाड नगर पंचायतीवर भाजपचा वरचष्मा राहिली आहे. गेल्या निवडणुकीतही एकूण १७ नगरसेवकांपैकी भाजपच्या १० नगरसेवकांचा विजय झाला. तर शिवसेनेच्या वाट्याला ५ जागा आल्या. त्याचवेळी दोन इतर नगरसेवक निवडून आले. त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडून आला. मात्र काही दिवसांपूर्वी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीत येथे भाजपात धुसपूस असल्याचे समोर आले. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकाला उपनगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने भाजपच्याच नगरसेवकांनी विरोध केल्याची चर्चा होती. त्याविरूद्ध नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीतही उपनगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवाराला भाजप नगरसेवकांनी मतदान केले. त्यामुळे भाजप उमेदवाराचा पराभव झाला. हा स्थानिक भाजपला मोठा धक्का होता.

त्यानंतर येथील नगरसेवकांनी मुरबाड परिवर्तन पॅनल पॅनल अशी स्वतंत्र आघाडी तयार केली. त्याच्या नोंदणीसाठी २६ मे रोजी नगरसेवक मोहन गडगे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जही करण्यात आला होता. अखेर ९ जून रोजी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मुरबाड परिवर्तन पॅनलला स्वतंत्र गटाची मान्यता दिली आहे. नऊ नगरसेवकांचा हा गट आता पालिकेत अस्तित्वात असेल. हा स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्यासाठीही मोठा धक्का मानला जातो. आता भाजपच्या गटात भापजचा एक आणि समर्थक दोन असे तीनच नगरसेवक असतील.

याबाबत भाजपचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र डाकी यांना विचारले असता, असा गट निर्माण झाल्याचे त्यांनी मान्य केले. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीवरून नगरसेवकांत नाराजी होती. आम्ही त्यांच्याशी संपर्क केला. आम्ही भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीती बैठकही घेणार होतो. त्यात काही अडचणी आल्या. मात्र सर्व नगरसेवकांचा फक्त उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर आक्षेप होता. इतर कोणतीही नाराजी नाही. ते आमच्यासोबतच आहेत, असे डाकी यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले आहे. त्यांनी प्रक्रिया केली होती, पण दोन ते तीन दिवसात भेट होईल, असेही डाकी म्हणाले.