ठाणे : स्मार्ट सिटी योजनेमध्ये झालेल्या कामांबद्दल नागरिकांना काय वाटते, त्याचे या प्रक्रियेचे आकलन काय आहे आणि त्यांना बदल जाणवतो का हे जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयामार्फत ‘नागरिक आकलन सर्वेक्षण-२०२२’ करण्यात येणार आहे. त्यात प्रभाग समित्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी सहाय्यक आयुक्ताबरोबरच्या बैठकीत सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : चंद्रकांत पाटील करणार अजितदादांचा ‘हिशोब’ चुकता

‘नागरिक आकलन सर्वेक्षण-२०२२’ मध्ये नागरिकांना नोंदवलेली मते, गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय यांनी संकलित केलेली माहिती आणि ठाणे महापालिकेने संकलित केलेली शहराशी निगडित ३७२ विषयांची माहिती यांचा अभ्यास करून नागरिकांचा शहराच्या नियोजनाचे धोरण ठरवण्यातील सहभाग वाढवण्यासाठी मार्गदर्शक प्रणाली तयार होणार आहे. सध्या आता माहितीचे संकलन आणि प्रमाणीकरण करण्याचा टप्पा सुरू आहे. केंद्र सरकारद्वारे या माहितीची छाननी झाल्यावर ती नागरिकांसाठी खुली होईल. त्यामुळे या सर्वेक्षणाबद्दल नागरिकांना माहिती देणे, त्यांचा सहभाग वाढवणे ही जबाबदारी प्रत्येक प्रभाग समितीवर असल्याचे संदीप माळवी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : समस्यांच्या विळख्यातील डोंबिवली गावाला दत्तक घ्या ; जागरुक नागरिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आर्जव

शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी फलक लावणे, शाळा, महाविद्यालये तसेच गृहनिर्माण संस्थांमध्ये प्रचार मोहिमा राबवून नागरिकांचा सहभाग वाढविता येईल. त्याचप्रमाणे, कल्पकतेने वेगवेगळी अभियाने राबविणे, स्मार्ट सिटीमध्ये झालेल्या कामांची चित्रप्रदर्शने आयोजित करावीत, अशा सूचना संदीप माळवी यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sandeep malvi role of ward committees important in citizen perception survey smart city thane tmb 01