ऋषिकेश मुळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अतिताणाखालील विद्यार्थ्यांना समुपदेशकांचा आधार

‘परीक्षेत उत्तीर्ण होईन का’,‘ पेपर कठीण गेला आहे. आता काय करू?’, ‘कितीही अभ्यास केला तरीही लक्षात रहात नाही’ या आणि यासारख्या असंख्य प्रश्नांचा मारा सध्या राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वाशी येथील कार्यालयात बसलेल्या समुपदेशकांवर होत आहे. मंडळाने सुरू केलेल्या विद्यार्थी मदत केंद्राचा दूरध्वनी सातत्याने खणखणत असून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करताना, त्यांच्या मनातील भीती कमी करताना समुपदेशकांची मात्र, धावाधाव होत आहे.

राज्यात बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून शुक्रवारपासून दहावीची परीक्षाही सुरू झाली. बोर्डाची महत्त्वाची परीक्षा असल्याने वर्षभर केलेल्या अभ्यासाची अंतिम उजळणी करून विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात असतात. मात्र अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या अतिताणामुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थी तणावाखाली जात असल्याचे समुपदेशकांकडून सांगण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मडंळातर्फे गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांंकरिता मदतकेंद्र सुरू करण्यात आले. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्य़ांसाठी मंडळाच्या वाशी विभागातील मदतकेंद्रावर विद्यार्थी-पालक मोठय़ा संख्येने संपर्क साधत आहेत.

विद्यार्थी अनेकदा केंद्राशी संपर्क साधून रडतात, खूप नैराश्यात असल्याचे समुपदेशकांना सांगून परीक्षेला येणारे प्रश्न सांगण्यासाठी विनवणी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. अनेकदा विद्यार्थी परीक्षेदरम्यान पेपर अवघड गेल्यामुळे आलेला राग काढण्यासाठी मदतकेंद्र दूरध्वनीवर संपर्क करून शिवीगाळही करत असल्याचे समुपदेशकांनी सांगितले.

१२ तास अखंड समुपदेशन

विद्यार्थी मदतकेंद्राचे क्रमांक परीक्षा मंडळाकडून परीक्षेच्या अगोदरच सर्वत्र प्रसारित करण्यात आलेले असतात. या मदतकेंद्रांवर १० प्रशिक्षित तज्ज्ञ समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत हे समुपदेशक दूरध्वनीवर संपर्क साधणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात व्यग्र आहेत.

संपर्क करणारे बरेचसे विद्यार्थी नैराश्यात असतात असे दिसून येते. पेपर अवघड गेला म्हणून विद्यार्थ्यांंनी चुकीचे पाऊल उचलू नये याकरिता विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांना धीर देण्याचे पहिले कार्य आम्ही करतो.  काही विद्यार्थी इतके नैराश्यात बोलतात की त्यांना हे समजवावे लागते की ही परीक्षा शेवटची नाही, पुढे अनेक करिअरच्या संधी आहेत.

-मुकेश दांगट, समुपदेशक

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telephone alerts on student help centers