ठाणे : ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदाईदरम्यान, निघणारी माती आणि दगडांची वाहतूक दररोज शेकडो डम्परद्वारे होणार असून ही वाहतूक परिसरातील गृहसंकुलांच्या आवारातून होणार असल्याचा आराखडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रहिवाशांना दिला आहे. मात्र, बोगदा खोदाई यंत्राच्या आवाजामुळे ध्वनी प्रदुषण होण्याबरोबरच त्यातून निघणाऱ्या माती, दगड वाहतूकीमुळे परिसरात हवा प्रदुषण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भिती रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर माती वाहतूक दुसऱ्या पर्यायी मार्गाने नेण्यात यावी तसेच भुयारी मार्ग गृहसंकुलासमोरील रस्त्याला जोडण्याऐवजी भुयारी मार्ग करण्याची मागणी रहिवाशांनी पुन्हा एकदा केली आहे.

ठाणे -बोरिवली भुयारी मार्गामुळे भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त करत स्थानिक रहिवाशांनी प्रकल्पास विरोध दर्शविला होता. स्थानिक रहिवाशांनी परिसरात आंदोलनही केले होते. या आंदोलनानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने काही दिवसांपुर्वी परिसरातील संकुलातील रहिवाशांची एक बैठक घेतली होती. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली होती. या बैठकीत स्थानिक रहिवाशांकरीता कशी मार्गिका असेल, याचे सादरीकरण एमएमआरडीएने केले होते. मात्र, भुयारी मार्ग करण्याचा आग्रह रहिवाशांनी धरला होता. अखेरीस रहिवाशी चर्चा करूनच मार्गीकेचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे बैठकीत ठरले होते. या चर्चेसाठी निळकंठ वुडस, निळकंठ ग्रीन, व्हेराटन, काॅसमाॅस लाउंज, सत्यशंकर या गृहसंकुलातील रहिवाशांनी प्रकल्पग्रस्त लोक अशी एक समिती स्थापन केली असून त्यात प्रत्येक संकुलातून काही नागरिकांची नियुक्ती केली आहे. असे असतानाच, ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदाईदरम्यान निघणाऱ्या मातीच्या वाहतूकीचा आराखडा एमएमआरडीएने स्थानिक रहिवाशांना दिला आहे. मात्र, या आराखड्यानंतर रहिवाशा पुन्हा आक्रमक झाले आहेत.

ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदाईदरम्यान, निघणारी माती आणि दगडांची वाहतूक दररोज शेकडो डम्परद्वारे होणार असून त्याचा आराखडा एमएमआरडीएने दिला आहे. यानुसार मुल्लाबाग येथून काॅसमाॅसच्या गेटपर्यंत कन्व्हेयर बेल्ट यंत्र बसविण्यात येणार आहे. या यंत्राद्वारे येणारी माती डम्परमध्ये भरली जाणार आहे. दररोज सुमारे पाचशे डम्परद्वारे ही माती वाहतूक होणार आहे. यामुळे माती वाहतूक परिसरातील गृहसंकुलांच्या आवारातून होणार आहे. बोगदा खोदाई यंत्राच्या आवाजामुळे परिसरात ध्वनी प्रदुषण होणार आहे. तसेच या माती वाहतूकीमुळे परिसरात हवा प्रदुषण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. डम्पर वाहतूकीमुळे स्थानिक रहिवाशांसह पादचारी, सायकलस्वार आणि ज्येष्ठ नागरिकांंना रस्ता ओलांडणे शक्य होणार नाही. त्यामुळे याचा आराखड्याचा पुनर्विचार करावा आणि पर्यायी मार्गे ही वाहतूक करावी, असे प्रकल्पग्रस्त लोक समितीचे सदस्य नितीन सिंग यांनी सांगितले. तुर्तास तरी आमचा प्रकल्पाला विरोध नाही. पण, भुयारी मार्ग संकुलासमोरील रस्त्यावरून नेण्याऐवजी भुयारीच नेण्यात यावा, अशी आमची आग्रही मागणी असून ती मान्य झाली नाहीतर प्रकल्पास आमचा विरोध असेल, असेही सिंग यांनी सांगितले.

इमारतीवर झळकले फलक

ठाणे -बोरिवली भुयारी मार्गास परिसरातील संकुलांमधून विरोध होत असतानाच, याच भागातील काॅसमाॅस लाउंज इमारतीवर प्रकल्पाविरोधात फलक लावण्यात आले आहेत. ‘विकास हाच पर्याय असतो पण, आरोग्य गमावून नाही. बोगदा दुसरीकडे हलवा’, असा मजकूर फलकावर लिहीण्यात आला आहे.

मुंबईत बैठक

ठाणे-बोरिवली भुयारी मार्गास परिसरातील संकुलातील रहिवाशांचा विरोध होत आहे. त्यांच्या शंकेचे निरसण करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने २० मे २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता मुंबईतील कार्यालयात एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला मुल्ला बाग रस्त्यावरील प्रकल्पग्रस्त लोक समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.