ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेने अनधिकृत इमारतींचा पाणी आणि वीज पुरवठा बंद करण्याची मोहिम हाती घेतली असून या मोहिमेत दोन दिवसांपुर्वी अनधिकृत बांधकामांच्या १४ नळ जोडण्या खंडित करण्याबरोबरच १० मोटर पंप जप्त आणि ११ बोअरवेल बंद करण्यात आल्या होत्या. त्यापाठोपाठ मंगळवारी दिवसभरात आणखी २८ अनधिकृत इमारतींचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत इमारती उभारण्यात येत आहेत. या इमारतींना वीज आणि पाणी पुरवठा होत असल्याने येथे रहिवाशी वास्तव्यास येतात. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अशा इमारतींचा वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने विशेष मोहिम हाती घेतली आहे.

या मोहिमेत गेल्या दोन दिवसांत दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या १४ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. या कारवाईदरम्यान, या नळजोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्याचे समोर आले. तसेच कारवाईत १० मोटर पंप जप्त करण्यात आले तर, ११ बोअरवेल बंद करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ मंगळवारी दिवसभरात ठाणे महापालिकेच्या पथकांनी संपुर्ण शहरात अशीच कारवाई केली.

कोणत्या भागात कारवाई

ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, माजिवडा-मानपाडा, वर्तकनगर, कळवा, लोकमान्य सावरकरनगर, उथळसर या परिसरातील अनधिकृत बांधकामाच्या नळजोडण्या खंडित, बोअरवेल बंद आणि पंप जप्त करण्याची कारवाई मंगळवारी करण्यात आली. या कारवाईत अनधिकृत बांधकामांच्या एकूण २८ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या. तर, १९ बोअरवेल बंद करण्यात आल्या आहेत. २ पंप जप्त करण्यात आले आहे. या सर्व नळजोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाईही करण्यात येत आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

आयुक्तांचे आदेश

अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला असल्यास त्याची कागदपत्रे तपासण्यात यावीत. तसेच, बांधकाम अवैध नळजोडण्या असल्यास त्या तात्काळ खंडीत करण्यात याव्यात, त्याचप्रमाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरुन अवैधरित्या नळ जोडणी घेतली असल्यास तीही तातडीने खंडीत करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाणी पुरवठा विभागास दिले आहेत.

६१ इमारतींची पाहाणी

या मोहिमेत अर्धवट बांधकाम असलेल्या तसेच व्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून तेथील नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. पंपही जप्त करण्यात आले असून काही ठिकाणी बोअरवेलही बंद करण्यात आल्या आहेत. तर ६१ इमारतींची पाहणी करण्यात आल्याचे उपनगर अभियंता (पाणी पुरवठा विभाग) विनोद पवार यांनी दिली.