ठाणे : ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवार, १२ ऑक्टोबर रोजी मोठ्याप्रमाणात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शहरीभागासह ग्रामीण भागातील क्षेत्राचा समावेश असून, ५ वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देऊन “पोलिओमुक्त समाज” या उद्दिष्टाकडे वाटचाल करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवारी उप राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित एएफपी सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करण्यासाठी लसीकरण करण्यात येणार आहे.
राज्यात सन १९९५ पासून ही उप राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम दरवर्षी राबविण्यात येते. त्यानुसार, सर्व महापालिका क्षेत्रात तसेच ग्रामीण भागात या मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. “प्रत्येक बालकाला पोलिओच्या लसीचे दोन थेंब देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. लसीकरणाद्वारेच आपण आपल्या मुलांचे आणि देशाचे भविष्य सुरक्षित करू शकतो.” असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती शिंदे यांनी समन्वय साधला असून, ठाणे जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा एकत्रित सहभाग या मोहिमेत आहे.
ठाणे महापालिकेमार्फत आवाहन
ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रामध्ये लसी मोफत उपलब्ध करण्यात आल्या असून त्याचा लाभ पालकांनी ०-५ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना देवून पल्स पोलिओ लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे
ग्रामीण भागात इतक्या बालकांना मिळणार पोलिओची लस
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, शहापू, भिवंडी आणि मुरबाड या ग्रामीण भागात एकूण १ लाख ३१ हजार ११० बालकांचा समावेश आहे. तर, बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात ६८हजार ८३३ बालकांचा समावेश आहे. त्यामुळे १ लाख ९९ हजार ९४३ बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. याठिकाणी १ हजार ८७५ लसीकरण केंद्रे असून त्याठिकाणी ४ हजार ७९२ कर्मचारी कार्यरत असणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली.